पुणे: विषारी दारूने हडपसर परिसरातील सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर पांढरे मळ्यातील दारूअड्ड्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. एकाच वस्तीत हे दोन दारूअड्डे असून, तीन शिफ्टमध्ये खुलेआम चोवीस तास येथे गावठी दारू विक्री सुरू होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी दै. ‘पुढारी’सोबत बोलताना सांगितले की, पांढरे मळा परिसरात दोन ठिकाणी हातभट्टी दारूची विक्री सुरू होती. यापैकी एक अड्डा आकाश जाधव आणि त्याच्या कुटुंबीयांचा आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते येथे दारूविक्री करतात, तर मंत्री मार्केट परिसरातील दुसरा अड्डा 40 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या धंद्यामुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनाधीन झाल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या हातभट्टीच्या अड्ड्यांवर तीन शिफ्टमध्ये कामगार काम करत होते. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंतच नव्हे, तर रात्री उशिराही येथे ग््रााहकांची वर्दळ असायची. परिसरातील अनेक मजूर, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि बेरोजगार युवक या ठिकाणी नियमितपणे दारू पिण्यासाठी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मृत्यू झालेल्या चारही व्यक्ती एकमेकांच्या जवळपास 700 मीटर परिसरात राहत होत्या. यातील काही जण गेल्या 20 वर्षांपासून दीपक जाधव यांच्या गुत्त्यावर दारू पीत असल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान, मिथेनॉलयुक्त किंवा रसायनमिश्रित दारूमुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित दारूविक्रेत्यांविरोधात मनुष्यवधासह कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दारूअड्ड्यांना गुंडांकडून प्रोटेक्शन
स्थानिकांच्या मते, या अवैध व्यवसायाविरोधात आवाज उठविणाऱ्यांना धमक्या दिल्या जात होत्या. तक्रार करणाऱ्या नागरिकांना गुंडांकडून मारहाण केल्याच्या घटनाही घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक भीतीपोटी पुढे येत नव्हते. ‘दारूविक्रेत्यांचा परिसरात मोठा दबदबा होता. काही गावगुंडांच्या मदतीने हा व्यवसाय चालवला जात होता,’ असे त्यांनी सांगितले.
पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष
या संपूर्ण प्रकारात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती. अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे काही पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले का, तसेच आर्थिक देवाणघेवाण झाली होती का, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.