मुंढवा: घोरपडी येथील रेल्वेमार्गालगत उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे काम अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण असून, काही भागांत भिंतीची उंचीही अपुरी आहे. परिणामी, नागरिक या भिंतीवरून किंवा अर्धवट असलेल्या कामाच्या ठिकाणी आत प्रवेश करून जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संरक्षक भिंतीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे, ज्या ठिकाणी भिंतीची उंची कमी आहे ती वाढवावी, तसेच संवेदनशील भागात नियमित पोलिस गस्त, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अन्य आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संभाव्य अपघात, अनधिकृत प्रवेश आणि गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि मुंढवा पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रेल्वेरुळालगत मद्यापींचा दिवसा आणि रात्री मद्यपींचा वावर आहे. यामुळे हा परिसर मद्यापींचा अड्डा झाला आहे. मद्यपींमधील वादावादी, शिवीगाळ आणि लुटमारीसारख्या घटना घडत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
रेल्वेच्या संरक्षक भिंतीची उंची ज्या ठिकाणी कमी आहे ती वाढवावी, तसेच अर्धवट असलेले काम प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे. रेल्वेमार्गालगत बसून मद्यपान करणाऱ्यांवर देखील पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.सीताराम नांदुरे, रहिवासी, घोरपडी