Engineering Admission Pudhari
पुणे

Engineering Direct Second Year Admission: डिप्लोमाधारकांना इंजिनिअरिंगच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची कोंडी; ९० टक्के गुण असूनही नामांकित कॉलेजचे दरवाजे बंद!

राखीव जागांचा कोटा २० वरून १० टक्क्यांवर; वाढत्या डिप्लोमा विद्यार्थ्यांमुळे प्रवेशासाठी जीवघेणी स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी सध्या केवळ १० टक्के जागा राखीव आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत तंत्रशिक्षण डिप्लोमा करून डिग्री करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. परिणामी, जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली असून नामांकित महाविद्यालयांमध्ये ९० टक्के गुण असतील तरच प्रवेशाची संधी मिळत आहे. यातून पॉलिटेक्निक डिप्लोमाचे विद्यार्थी आणि पालक हवालदिल होत असल्याचे दिसून येत आहे.

पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा कौशल्य शिक्षणाचे महत्त्व गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण पदविकेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, त्यामुळे विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर, इंजिनिअरिंगच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पॉलिटेक्निक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेता यावा, यासाठी २० टक्के जागा राखीव होत्या. काही वर्षांपूर्वी पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होता. पॉलिटेक्निकचे प्रवेश साधारण ६० ते ७० हजारांदरम्यानच व्हायचे. त्यामुळे राखील कोट्यातील जागाही रिक्त राहायच्या. परिणामी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने हा कोटा १० टक्के केला होता. तो अद्यापही तसाच असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी व्यवस्था निर्माण करा

केंद्र सरकार आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आदी क्षेत्रासंबंधी मोठे निर्णय घेत आहे. प्रत्यक्षात, देशातील प्रगत अशा महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर, आयटी अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी देखील मिळत नाही, असे चित्र पॉलिटेक्नीक विद्यार्थ्यांच्या पदवी प्रवेशातील अडचणींवरून दिसून येत आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि 'डीटीई'ने या प्रवेश प्रक्रियेत लक्ष घालून किमान 'डिस्टिंक्शन' मध्ये संगणक क्षेत्राशी संबंधित पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तरी त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित पदवीसाठी प्रवेश मिळावा, अशी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

प्रवेशासाठी राखीव कोटा १० टक्केच

तंत्रशिक्षण संचालनालयाने 'स्कूल कनेक्ट'सारख्या उपक्रमाद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगितले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षी वाढत आहे. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. परंतु प्रवेशासाठी राखीव कोटा १० टक्केच आहे. त्यामुळे द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत असमतोल निर्माण झाला आहे. डिप्लोमाला ८० ते ९० टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आवडत्या शाखेत प्रवेश घेता येत नाही. तर काही विद्यार्थ्यांना इच्छा नसूनही 'इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन', 'इलेक्ट्रिकल' आदी सध्या महत्व नसलेल्या शाखांमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली आहे.

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी २० टक्के जागांवरून १० टक्के करण्यात आल्यामुळे डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पूर्वी २० टक्के जागा उपलब्ध असल्यामुळे डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होत होत्या. परंतु सध्याच्या १० टक्के मर्यादेमुळे उपलब्ध जागांची संख्या कमी झाली असून पात्र विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठीची स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उपलब्ध होणाऱ्या संधी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता शासनाने व संबंधित प्राधिकरणांनी सकारात्मक पुनर्विचार करणे गरजेचे आहे.
प्रा. उद्धव शिद, संचालक, झील एज्युकेशन सोसायटी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT