

परिंचे: वीर (ता. पुरंदर) परिसरातील अनेक वीज ग्राहकांना अचानक अवाच्या सव्वा रकमेची वीजबिले मिळत आहेत. येथील अनेकांना सुमारे ५०० रुपये येणारी वीजबिले आता थेट ५ हजार रुपयांपर्यंत वाढली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता ही बिले कमी करण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत आहे.
येथील अनेकांना यापूर्वी सरासरी ४००, ५०० ते ८०० रुपये वीजबिल येत होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या बिलात वाढ होऊन ते थेट ४ ते ५ हजार रुपयांवर पोहचले आहेत.
प्रशासन मात्र त्यातील फक्त १००० ते १२०० रुपये कमी करत आहेत. तसेच उर्वरीत बिल भरण्यास भाग पडत असल्याचा आरोप ग्राहक महादेव जमदाडे, गणेश मोरे, नारायण जमदाडे, रोहित वाघ यांनी सांगितले.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, मागील महिन्यांच्या तुलनेत वीज वापरामध्ये विशेष वाढ नसतानाही बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मीटर रीडिंग अचूक घेतले जाते का, बिलिंगमध्ये तांत्रिक त्रुटी आहेत का, आणि मीटरच्या नोंदींची योग्य पडताळणी होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महावितरणकडून चुकीचे किंवा जास्त रकमेचे बिल आल्यास ग्राहकांनी तक्रार नोंदवून त्याची दुरुस्ती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यासाठी आता नागरिकांना महावितरण कार्यलायत धावपळ करावी लागणार आहे.
वीजवापर जितका आहे, त्यापेक्षा बिलाची रक्कम अधिक आले आहे. याची जबाबदारी ग्राहकांची नसून बिलिंग यंत्रणेची आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास देण्याऐवजी महावितरणने स्वतःहून बिलांची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मीटर रीडिंगची पारदर्शकता गरजेची वीर परिसरातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन महावितरणने संबंधित ग्राहकांच्या मीटरची प्रत्यक्ष तपासणी करावी. मागील काही महिन्यांच्या वीजवापराची तुलना करून संशयास्पद बिलांची फेरतपासणी करावी, तसेच चुकीची बिले आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली.
महावितरणने ग्राहकांना दिलासा द्यावा वीज ग्राहक हा महावितरणचा महसूल देणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बिलिंगमध्ये पारदर्शकता, अचूक मीटर रीडिंग आणि तक्रारींचे वेळेत निराकरण होणे आवश्यक आहे. वीरमधील अवाजवी वीजबिलांच्या तक्रारींची चौकशी करून दोषी यंत्रणेविरुद्ध कारवाई करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.