Crop Loss Pudhari
पुणे

Dimbhe Dam Crop Loss: डिंभे धरणाचे पाणी उशिरा; आंबेगावातील शेतकऱ्यांची पिके जळून खाक

उन्हाळी आवर्तन दहा दिवस उशिराने सुटल्याचा फटका; भुईमूग, बाजरी, फ्लॉवरसह चारापिकांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पारगाव: आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे परिसरात डिंभे धरणाच्या डावा कालव्याच्या घोड शाखेला उन्हाळी आवर्तन तब्बल दहा दिवस उशिराने सोडण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. कडक उन्हाळा आणि वेळेत पाणी न मिळाल्यामुळे भुईमूग, बाजरी, कोबी-फ्लॉवर यांसारखी पिके अक्षरशः जळून गेली. काही शेतकऱ्यांना उभी पिके सोडून त्यामध्ये शेळ्या-मेंढ्या चरायला सोडल्या आहेत.

थोरांदळे गावातील बहुतांश शेती डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा उन्हाळा अत्यंत तीव असल्याने पिकांना नियमित पाण्याची मोठी गरज होती. मात्र, उन्हाळी आवर्तन वेळेत न सुटल्याने पिकांना पाण्याचा तीव ताण सहन करावा लागला; परिणामी अनेकांची पिके करपली.

गुंडामळा परिसरातील शेतकरी जयराम भीमाजी खरमाळे यांनी आपल्या शेतात भुईमूग, बाजरी तसेच कोबी-फ्लॉवर ही नगदी पिके घेतली होती. या पिकांसाठी त्यांनी सुमारे 75 हजार रुपयांचे भांडवल गुंतविले होते. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाणी न मिळाल्याने संपूर्ण पिके जळून गेली.

अनेक शेतकऱ्यांनी पिके जळाल्याने त्यात जनावरे सोडली आहेत. जयराम खरमाळे यांनीही फ्लॉवरच्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या. परिसरातील जनावरांच्या चाऱ्यासाठी घेतलेल्या मका, घास, कडवळ या चारापिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

यंदाचा उन्हाळा खूप कठीण आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळणे गरजेचे होते. मात्र, आवर्तन उशिराने सोडण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके जळून गेली. भुईमूग, बाजरी, कोबी-फ्लॉवर तसेच जनावरांच्या चारापिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जयराम खरमाळे, स्थानिक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT