पुणे: शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय व आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागांतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, जात वैधता प्रमाणपत्राशी संबंधित त्रुटींची पूर्तता अद्याप न केलेल्या विद्यार्थ्यांमुळे प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.ही बाब लक्षात घेऊन बार्टीच्यावतीने सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पात्र असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी उशिराने अर्ज सादर केल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या निदर्शनास आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्या दूर करण्याबाबत समित्यांकडून ई-मेल, पत्र किंवा अन्य माध्यमातून अर्जदारांना कळविण्यात आले आहे.
मात्र, संबंधित सूचना मिळूनही अनेक विद्यार्थी अद्याप समित्यांशी संपर्क साधत नसल्याचे दिसून आले आहे.त्रुटी पूर्ततेची जबाबदारी विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदाराची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासून, समितीकडून त्रुटी पूर्ततेबाबत सूचना असल्यास त्या तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्रुटी प्रलंबित राहिल्यास जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होऊ शकतो आणि त्याचा परिणाम व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशावर होण्याची शक्यता आहे.
सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि प्रवेशाच्या विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्राबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करता यावी, यासाठी आवश्यकतेनुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. बार्टीचे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक यांनी समित्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.प्रवेशापासून वंचित राहू नये.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधावा. अर्जातील प्रलंबित त्रुटी तातडीने दूर केल्यास समितीला विहित वेळेत अर्जावर निर्णय घेणे शक्य होणार आहे.त्यामुळे ज्या अर्जदार किंवा विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी संबंधित समितीशी त्वरित संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेच्या महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या मुख्य समन्वयक दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.