मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून, या ठिकाणी देशभरातून भाविक भक्त येत असतात या ठिकाणी मंजूर झालेल्या विकास आराखड्यातील कामे कुंभमेळा सुरू होण्याअगोदर ९०टक्के पूर्ण करतील याचा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शनिवारी सांगितले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री,आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे, आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील मुख्य मंदिर, पायरी मार्ग, सभा मंडळ याचे काम गेल्या पाच महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे, हे काम करत असताना स्थानिक गावच्या लोकांनी दाखवलेले सहकार्य महत्त्वाचे आहे. या ठिकाणी असलेल्या दीडशे घरांचे स्थलांतर होणार असून, त्यांच्यासाठी गाव वसवण्यात येणार असून, हे गाव अतिशय सुंदर बनवण्यात येणार आहे.
भीमाशंकर येथे दर्शनासाठी आलेले भाविक हे या गावालासुद्धा भेट देतील, असे गाव बनवले जाईल. भीमाशंकरकडे येण्या-जाण्यासाठी आता स्वतंत्र रस्ते बनवण्यात येणार असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. व्यापाऱ्यांची दुकाने व्यवस्थित मांडण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था केली जाईल. निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता काम करत एक नैसर्गिक कॉरिडॉर तयार होईल, असा प्रयत्न आहे. भगवान शिव शंकराला प्रसन्न वातावरण आवडते त्यामुळे हा कॉरिडॉर प्रसन्न वातावरणाचा होईल.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजित करण्यात आलेल्या 'हेरिटेज वाडी' प्रकल्पाला गती मिळाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रकल्पस्थळी भेट देत कामांचा आढावा घेतला. धार्मिक पर्यटन, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या आर्थिक उन्नतीचा समतोल साधणारा हा प्रकल्प भविष्यात भीमाशंकरची नवी ओळख निर्माण करेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित पुनर्वसित गावाची जागा, भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा आणि ग्रामविकासाचा आराखडा यांची सविस्तर माहिती घेतली. या वेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , आमदार महेश लांडगे, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की भीमाशंकरला भेट देणाऱ्या भाविकांना केवळ मंदिर दर्शनच नव्हे, तर स्थानिक संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देण्याच्या उद्देशाने 'हेरिटेज वाडी'ची संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत सध्या मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अल्प अंतरावर नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यात येणार आहे. नव्या वसाहतीमध्ये पारंपरिक वास्तुरचनेसह आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र, अंतर्गत रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा तसेच पर्यटकांसाठी आकर्षक व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
पर्यटनवाढीमुळे स्थानिकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी व्यावसायिक गाळे, सेवा केंद्रे आणि पर्यटनपूरक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या वाढत्या संख्येचा थेट लाभ स्थानिक अर्थव्यवस्थेला होणार आहे. प्रकल्पामुळे मंदिर परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठी सुधारणा होणार आहे. धार्मिक पर्यटनासोबत पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श उभा करत भीमाशंकरला राष्ट्रीय स्तरावरील आकर्षक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.