बारामती: दुचाकी, तीनचाकी अथवा चारचाकी वाहनांवर अवैधरीत्या भोंगा लावत शहरभर फिरून व्यवसाय करणाऱ्या फिरत्यांच्या भोंग्यांमुळे बारामतीकर आता हैराण झाले आहेत. सकाळी सात वाजेपासूनच शहरात कांदे घ्या कांदे... बटाटे घ्या... केस घेणार... भंगार घेणार... असे भोंगे वाजत असून, कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
उपजीविकेसाठी असा व्यवसाय करणे गैर नाही. या व्यावसायिकांचे त्यामागे मोठे कष्ट आहेत. दारोदार फिरून ते आपला माल विकतात, विकत घेतात, हे सगळे मान्य असले तरी त्यांच्याकडून वाहनांवर लावले जाणारे भोंगे नागरिकांना हैराण करीत आहेत. अशा भोंग्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहेत. वाहनांसह अगदी हातगाडीवरसुद्धा असे भोंगे बसविले जात आहेत. यामध्ये स्थानिकांसह अनेक परप्रांतीय व्यावसायिकांचाही समावेश आहे.
शहरातील गल्लीबोळात, सोसायट्यांमध्ये, शिक्षण संस्थांच्या परिसरात दिवसभर भोंगा वाजवत हे विक्रेते फिरत असतात. त्यात बारामती नगरपरिषदेची कचरागाडी एकसारखा कर्कश भोंग्याचा वापर करीत असल्याने त्याचाही नागरिकांना त्रास होतो. भल्यापहाटेपासूनच ही कचरागाडी शहराच्या विविध भागांत मोठ्या आवाजात भोंगा लावत फिरत असते.
यासह शहरातील अनेक हॉटेल व अन्य व्यावसायिक, ॲकॅडमीचालक सध्या शहरभर रिक्षा स्पीकरद्वारे आपापल्या जाहिराती करीत आहेत. त्यामुळे भल्यापहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शहरातील नागरिकांना कर्कश भोंग्यांचा आवाज सहन करावा लागतो आहे. कचरागाड्यांना भोंगा लावण्यास परवानगी असली, तरी आवाजाची मर्यादा त्यांनी पाळावी, अशी मागणीही आता नागरिक करू लागले आहेत.
वापरावर बंधने आणण्याची मागणी
फिरस्त्यांसोबतच इतर व्यावसायिकांकडून देखील भोंग्यांचा केल्या जात असलेल्या वापरावर काहीतरी बंधने आणावीत, अशीही मागणी पुढे येऊ लागली आहे. सध्या शालेय परीक्षा सुरू असल्याने परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना या आवाजाचा त्रास होत असून, वयस्कर आणि रुग्णांना याचा मोठा मनस्ताप होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.