

दिवे: जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी सध्या वाढत्या उत्पादनखर्चामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. पशुखाद्याचे वाढते दर, हिरव्या चाऱ्याची कमतरता आणि गायींच्या प्रजननासंबंधी वाढत्या अडचणींमुळे दूध व्यवसाय तोट्यात जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत जनावरांच्या खाद्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच हवामानबदल, अनियमित पाऊस आणि पाणीटंचाईमुळे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना महागड्या दराने चारा खरेदी करावा लागत असून, उत्पादनखर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.
याचबरोबर सध्या नर वासरांचे व्यवस्थापन हा नवा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. गायीने नर वासराला जन्म दिल्यास त्याचे संगोपन आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहेत. यासंदर्भात शासनाने ठोस धोरण आखावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. दरम्यान, गायी गाभण राहण्यात येणाऱ्या अडचणींमुळेही शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. गायी व्यायल्यावर पुन्हा गाभण राहण्यासाठी अनेकवेळा कृत्रिम रेतन (सीमेन) करावे लागत आहे. यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.
सीमेन व संबंधित सेवांचे दर कमी करावेत तसेच त्या सहज उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी दूध उत्पादकांकडून केली जात आहे. गायी वेळेवर गाभण न राहिल्याने पुढील वेताला दूध उत्पादनात देखील घट होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी कमी होत आहे. एकूणच, वाढता खर्च आणि घटते उत्पादन, यामुळे दूध व्यवसायाची आर्थिक गणिते बिघडली आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात; अन्यथा दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या एकवेळ कृत्रिम रेतन (सीमेन्स) भरण्यासाठी साधारण दोनशे ते तीनशे रुपये आकारले जातात. सरकारी व खासगी दोन्ही ठिकाणी समानच फी आकारली जाते. सरकारी दवाखान्यात दर्जेदार सीमेन्स उपलब्ध झाली, तर शेतकऱ्यांचा वायफळ खर्च वाचेल व दुग्धोत्पादकांना दिलासा मिळेल.
अनिल झेंडे, दुग्धोत्पादक शेतकरी, दिवे