

भोर: महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील महाड ते भोरदरम्यान असलेला वरंध घाट रस्त्याच्या कामासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणासाठी 25 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी (दि. 25) याबाबतचा आदेश दिला असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
घाटातील हिर्डोशी ते वरंध घाटातील (कि. मी. 70/900 ते 92/003) या 21 किलोमीटर अंतराच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे क्षेत्र दरडप्रवण आहे. या जागेवरील परिस्थितीनुसार रस्त्याच्या हिर्डोशी ते वरंध या घाट लांबीमध्ये बऱ्याच ठिकाणी वेडीवाकडी धोकादायक वळणे आहेत. 21 किलोमीटर अंतरापैकी साडेतीन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
मात्र, उर्वरित लांबीमध्ये एका बाजूला नीरा-देवघर धरणाचे बॅकवॉटर (पाणलोट क्षेत्र) व दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने वाहतूक वळविण्यासाठी अपेक्षित रुंदी मिळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, या मार्गावरील काही भाग हा वनविभागाच्या हद्दीतून आहे. त्याच्या मंजुरीसाठी वनविभागाचे नागपूर येथील अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी अर्ज दाखल केलेला आहे.