

बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात शनिवारी (दि. 28) भाजीपाल्याची आवक समाधानकारक राहिली. काही प्रमुख पिकांना चांगले दर मिळाल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः लसूण, गवार, राजमा यांसारख्या पिकांचे दर चांगले निघाले, तर काही पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले. मार्चअखेरमुळे बारामती बाजार समितीच्या मुख्य यार्डातील भुसार धान्यांचे लिलाव गुरुवारी बंद राहिले होते. जळोची उपबाजारात फळे व भाजीपाल्याचे लिलाव होतात.
शुक्रवारी येथील मार्केट बंद असते. शनिवारी मात्र जळोची उपबाजारात विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि फळांची मोठी आवक झाली. गावरान गवारीची समितीत 12 क्विंटल आवक झाली. किमान चार हजार ते कमाल दहा हजार आणि सरासरी आठ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. उपबाजारात गवारीला 80 रुपये प्रतिकिलो दर मिळत असला तरी प्रत्यक्षात किरकोळ विक्रीत 120 रुपयांच्या पुढेच गवारीचे दर आहेत. पुणेरी गवारीची 15 क्विंटल आवक झाली. तिला अडीच हजार ते पाच हजार व सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आठ क्विंटल राजमा समितीत आला होता. त्याला किमान दीड हजार ते कमाल साडेचार हजार व सरासरी चार हजार दर मिळाला.
बाजारात लसणाची सर्वाधिक आवक नोंदली गेली. सुमारे 100 क्विंटल आवक झालेल्या लसणाला किमान 4000 रुपये, कमाल 12000 रुपये, तर सरासरी 8000 रुपये दर मिळाला. हिरवी मिरची, टोमॅटो, वांगी आणि काकडी यांसारख्या भाजीपाल्यांची आवक मध्यम राहिली. हिरव्या मिरचीला सरासरी 8000, टोमॅटोला 1300, वांग्याला 2000, तर काकडीला 1200 रुपये दर मिळाला. भेंडी, कारले आणि दोडका या पिकांचे दरही स्थिर राहिले असून, सरासरी 3000 ते 1500 रुपयांदरम्यान व्यवहार झाले.
पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, कांदापात यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र, या पिकांचे दर तुलनेने कमी राहिले. सरासरी 400 ते 700 रुपयांपर्यंतच दर मिळाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळाला नाही. फळांत सफरचंदाला सर्वाधिक 15,000 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला; तर केळी, मोसंबी आणि कलिंगडाचे दर 1000 ते 3000 रुपयांदरम्यान राहिले. कलिंगड, खरबुजाची आवक समितीत चांगली होत आहे.
अवकाळी परिणाम जाणवणार पुढील आठवड्यात
एकूणच, बाजारात विविध पिकांची आवक संतुलित राहिल्याने दरात मोठा चढ-उतार दिसून आला नाही. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कमी-अधिक प्रमाणात होत आहे. अवकाळीने सुटका केली नाही, तर पुढील आठवड्यातील तरकारीच्या तसेच कलिंगड, खरबूज, काकडीसारख्या उन्हाळी फळांच्या आवकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.