बारामती: विकासाच्या प्रक्रियेत रस्ते मोठे होणे आता काळाची गरज बनली आहे. बारामती तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून बारामती-निरा रस्ता ओळखला जातो. या रस्त्याचे गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने रुंदीकरण सुरू आहे. त्यासाठी शेकडो वर्षे जुनी वड, पिंपळ, चिंच यांसारखी हजारो झाडे तोडली गेली आहेत. परिणामी हा रस्ता बकाल बनला आहे. यंदाच्या वारीलाही त्याचा फटका बसणार असून, रखरखत्या वाटेवरून चालणे वारकऱ्यांसाठी जिकीरीचे बनणार आहे.
आषाढी वारीचा सोहळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना, यंदा वारकऱ्यांना रखरखत्या उन्हातच पायीवारी करावी लागणार आहे. बारामती-निरा राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे हजारो झाडांची कत्तल झाल्याने पालखी मार्गावर सावलीचा पूर्णतः अभाव जाणवत आहे.
दरवर्षी संत सोपानदेव पालखी सोहळा बारामती तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. मात्र, यंदा मार्गावरील झाडांची तोड आणि अपूर्ण कामांमुळे वारकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. हवामान विभागानेही यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने वारकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जुन्या व मोठ्या सावलीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. पूर्वी वड, पिंपळ, जांभूळ, लिंब यांसारखी दाट सावली देणारी झाडे वारकऱ्यांसाठी आधार ठरत होती. या झाडांच्या सावलीत वारकरी विसावा घेत पुढील प्रवासाला निघत असत. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामांमुळे हा मार्ग आता पूर्णतः उजाड आणि भकास झाला आहे.
प्रशासनाकडून वृक्षारोपण करण्यात आले असले, तरी झाडे जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना न झाल्याने अनेक रोपे वाळून गेली आहेत. या मार्गावर पुन्हा दाट सावली निर्माण होण्यासाठी किमान 10 वर्षांचा कालावधी लागणार आहे.