बारामती: पाऊस नाही, जनावरांना चारा नाही, पेरण्या नाहीत, वाढलेली प्रचंड महागाई... अशातच आता शेतकऱ्यांना सतत वाढत असलेल्या इंधन दराचाही फटका सहन करावा लागत आहे. इंधनाचे दर वाढल्याने शेती मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
गेल्या महिन्यात इंधन दरात सलग तीन वेळा वाढ झाली आहे. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या सर्व मशागतींच्या खर्चात वाढ झाली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जेसीबी चालकांनी प्रतितासाचा दर हजार रुपयांवरून बाराशे रुपये केला आहे. याशिवाय नांगरट, रोटर, पेरणी, सरी काढणे आदी कामांसाठी शेतकऱ्यांना जादा खर्च करावा लागत आहे. फक्त डिझेलचेच दर वाढले नाहीत तर स्पेअर पार्ट, वाहनांना लागणारे ऑईल यामध्येही वाढ झाली आहे.
अमेरिका-इराण युद्ध थांबल्यानंतरही होणारी इंधन दारवाढ शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या खाईत लोटणारी ठरली. आधीच खतांच्या वाढलेल्या किंमती, शेतमजुरी, वीज समस्यांमुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच भाजीपाला, कांदा आणि इतर पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. सरकारकडून ३० जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी, वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी या संकटातून सावरणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
ट्रॅक्टर व्यावसायिकांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे जुन्या दरात मशागत करणे परवडत नाही. सोमेश्वर जेसीबी संघटनेच्या वतीने याबाबत सोमेश्वरनगर येथे चौकात बॅनर लावून दर वाढीची माहिती देण्यात आली आहे. या ट्रॅक्टर तसेच जेसीबीचालकांनी वाढलेल्या डिझेल दरामुळे मशागतीचे दर वाढवले आहेत. या वाढत्या महागाईमुळे शेती करावी की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
मशागतीच्या दरात मोठी वाढ
नांगरट ३०००- ३५००
रोटर २०००- २५००
कल्टीवेटर १२००- १६००
सरी काढणे १८००- २२००
पेरणी २०००-२५००
जेसीबींचे वाढलेले दर
जेसीबी बकेट काम १२०० रुपये प्रतितास
जेसीबी ब्रेकर काम १७०० रुपये प्रतितास
डबर व मुरूम भरणे २०० रुपये ब्रास
डंपिंग खत भरणे ४०० रुपये
चारचाकी ट्रेलर भरणे ६०० रुपये
माती भरणे १५० रुपये ब्रास