Baba Adhav Pudhari
पुणे

Dr. Baba Adhav: अजित पवार ते केंद्रीय मंत्री मोहोळ—राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजली

श्रमिक चळवळीचा तेजस्वी दीप विझला

पुढारी वृत्तसेवा

पुणेः समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.

श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात की, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काच-पत्रा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य बाबा आढाव यांनी केले. 'एक गाव एक पाणवठा' ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला.

बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून, महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे.

'असंघटितां'साठी आयुष्यभर लढणारे कार्यकर्ते

समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत, रिक्षाचालक, हमाल, मोलमजुरी करणारे असंघटित कामगार यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे कार्यकर्ते म्हणून बाबांची ओळख होती. महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याचा पुण्यावर दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रभाव राहिला आहे. असंघटित मजुरी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा दिला. हमाल, माथाडी, फेरीवाले, बांधकाम कामगार, बाजार समित्यांमधील कामगार यांना संघटित करून या श्रमिकांच्या हक्कांसाठी बाबांनी लढा दिला. 'माथाडी आणि इतर हातगाडी कामगार कल्याण मंडळ' ही प्रणाली उभी राहण्यामागे त्यांचे निर्णायक नेतृत्व होते. पुण्यातील असंघटित मजुरांना ओळखपत्र, वेतन संरचना, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या निधनाने पुणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. मी नगरसेवक, महापौर असताना विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली, मार्गदर्शनही मिळाले होते.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

श्रमिकांच्या चळवळीचा मार्गदर्शक हरपला

“श्रमिकांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे बाबा आढाव यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. साधेपणा, तत्त्वनिष्ठा आणि न्यायासाठीच्या अविचल संघर्षामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या कार्यातून उभारलेली सहकार आणि श्रमिक चळवळ ही आपल्या समाजाची अमूल्य संपदा आहे. त्यांच्या निधनाने श्रमिक चळवळीचे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले.

माधुरी मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT