AI Literacy Pudhari
पुणे

AI Literacy: आता ‘एआय साक्षर’ असणेच नवी साक्षरता; योग्य, सुरक्षित वापराचे ज्ञान काळाची गरज

शिक्षणापासून शेती-उद्योगापर्यंत वाढला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; माहितीची सत्यता तपासणे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: एकेकाळी वाचता-लिहिता येणे म्हणजे साक्षरता, अशी साक्षरतेची व्याख्या होती. त्यानंतर संगणक आणि डिजिटल साधनांचा वापर करता येणे ही डिजिटल साक्षरतेची नवी ओळख निर्माण झाली. आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वेगाने दैनंदिन जीवनाचा भाग बनत असताना एआयचा योग्य, सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करता येणे हा साक्षरतेचा नवा मापदंड ठरत असल्याची माहिती आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणापासून उद्योग-व्यवसायापर्यंत आणि प्रशासनापासून आरोग्य, शेती व माध्यम क्षेत्रापर्यंत एआयचा वापर वाढत आहे. त्यामुळे एआय म्हणजे केवळ चॅटबॉटला प्रश्न विचारणे नव्हे, तर एआय कसे काम करते, त्याच्या मर्यादा काय आहेत, मिळालेली माहिती खरी आहे की नाही हे कसे तपासायचे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवायची, याचे ज्ञान असणे आवश्यक बनले आहे. आय साक्षरतेमध्ये एआयला योग्य सूचना अर्थात 'प्रॉम्प्ट' देण्याबरोबरच त्याने दिलेल्या उत्तराचे चिकित्सक मूल्यमापन करण्याची क्षमता महत्त्वाची आहे. असे देखील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागापर्यंत एआयचे ज्ञान पोहोचविण्याची गरज

एआयचा लाभ केवळ शहरांपुरता मर्यादित राहू नये, यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांपर्यंत एआयचे प्राथमिक ज्ञान पोहोचणे आवश्यक आहे.

तरुणांनी एआयकडे केवळ नोकरीचे साधन म्हणून न पाहता, नवकल्पना, उद्योजकता आणि समाजपरिवर्तनाची संधी म्हणून पाहावे. चला एआय शिका, प्रयोग करा आणि जबाबदारीने वापरा. कारण उद्याचे नेतृत्व तंत्रज्ञान-साक्षर तरुणांच्या हातात आहे.
डॉ. दीपक शिकारपूर, आयटीतज्ज्ञ
एआयमुळे कामाचा वेग वाढणार असून, अनेक नवीन दालने उघडणार आहेत. त्यामुळे एआयसाठी वेळ देऊन ते समजून घेऊन त्याचा चांगला वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात एआय साक्षर जो असेल तोच खरा साक्षर असे म्हणावे लागणार आहे.
जितेंद्र सरदेसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसोर्स इन्फोसिस्टिम्स
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात साक्षरता म्हणजे केवळ वाचणे आणि लिहिणे नव्हे, तर सतत शिकणे, प्रश्न विचारणे आणि परिस्थितीनुसार जुळवून घेणे होय. भाषा, भौगोलिक सीमा आणि आर्थिक स्तर यांसारखे अडथळे ओलांडून दर्जेदार शिक्षण पोहोचवण्यासाठी 'एआय'चा वापर करण्याची संधी भारताकडे आहे. . या 'साक्षरता दिना'निमित्त, आपण सर्व जण एकत्र येऊया आणि आपली क्षमता पूर्णपणे विकसित करण्याच्या दिशेने पावले उचलूया.
सुनील कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, फिडेल सॉफ्टटेक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT