शिवदास शितोळे
परिंचे: ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ ही म्हण एकेकाळी ग््राामीण भागात अभिमानाने उच्चारली जायची. शेती हा स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जात होता. मात्र, बदलत्या परिस्थितीत ही म्हण आता वास्तवापासून दूर गेल्याचे चित्र दिसत आहे.
अवकाळी पाऊस, दुष्काळ, खते-बियाणांचे वाढते दर, उत्पादनाला न मिळणारा हमीभाव आणि बाजारातील दलालांचे वर्चस्व यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दिवस-रात्र मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक तरुण शेतीपासून दूर जात आहेत.
पूर्वी शेतीकडे सन्मानाने पाहिले जात होते. मात्र, आज ग््राामीण भागातील युवक नोकरी आणि शहरांकडे अधिक आकर्षित होत आहेत. ‘शेती करून भविष्य नाही’ अशी भावना वाढत असल्याने अनेक शेतजमिनी पडिक राहत आहेत. नियमित उत्पन्नाच्या अपेक्षेने लोकांचा कल व्यापार आणि खासगी नोकऱ्यांकडे वाढला आहे.
काही शेतकरी कर्जबाजारीपणामुळे, तर काही शहरांतील झगमगाटाच्या आकर्षणामुळे शेती विकत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ‘शेती विकायची नसते, ती जपायची असते,’ ही जुन्या पिढीची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त होत आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, शेतकरी शेती करत राहिला आणि जगाचा अन्नपुरवठा सुरू ठेवला. त्यामुळे शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, शेतमालाला योग्य बाजारपेठ, साठवणूक सुविधा आणि हमीभाव मिळाल्यास शेती पुन्हा फायदेशीर ठरू शकते, असे मत व्यक्त होत आहे.
“शेती हीच देशाची खरी ताकद आहे. शेतकरी टिकला तरच देश टिकेल. ‘उत्तम शेती’ ही म्हण पुन्हा वास्तवात आणण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे,” असे मत वीर येथील प्रगतिशील शेतकरी संतोष धुमाळ यांनी व्यक्त केले.