वसई : मंगळवारी वसई-विरार महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांची निवड झाली तर उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांची निवड झाली आहे. अजीव पाटील हे विरार महापालिकेचे सातवे महापौर ठरले आहेत. तर मार्शल लोपीस हे महापालिकेचे पाचवे उपमहापौर ठरले आहेत. या निवडीनंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार क्षितिज ठाकूर व राजेश पाटील, माजी महापौर राजीव पाटील व नारायण मानकर, ज्येष्ठ नेते जितुभाई शहा, प्रकाश वनमाळी, विलास चोरघे आदींनी महापौर व उपमहापौर यांचे हार्दिक अभिनंदन केले.
या निवड प्रक्रीयेवेळी वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, महानगरपालिका सचिव विश्वनाथ तळेकर, महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, उपविभागीय अधिकारी वसई शेखर घाडगे, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, प्र.शहर अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या उत्तम नियोजनामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सदर निवड प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणुकीत बविआने विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 115 जागापैकी बविआला 70, काँग्रेसला 1, भाजपाला 43, शिवसेनेला (शिंदे गट) 1 जागा जिंकता आली आहे. या निवडणुकीनंतर सर्वानाच महापौर निवडीचे वेध लागले होते.
बविआकडे स्पष्ट बहुमत असल्याने सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी बविआसह भाजपनेही महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले होते. महापौर पदासाठी बविआतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे, तर भाजपकडून ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज सादर केले होते. तर उपमहापौरपदासाठी बविआकडून कन्हैया भोईर, मार्शल लोपीस तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
शिट्टी हे बहुजन विकास आघाडीचे निवडणूक चिन्ह होते. निवडणुकीच्या काळात शिट्टी वाजवून उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता. तर महापौर निवडीच्या दिवशी मतदानापूर्वी सर्व नगरसेवकांना शिट्टीचे वाटप करण्यात आले होते. तर महापौर आणि उपमहापौर पदी बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आणि मार्शल लोपीस यांची निवड होताच सर्व नगरसेवकांनी शिट्टी वाजवून जल्लोष केला.
महापौर पदाच्या निवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात होते. यापैकी बहुजन विकास आघाडीच्या प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे यांनी माघार घेतली. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आणि भाजपच्या दर्शना कोटक त्रिपाठी यांच्यात थेट लढत झाली. यावेळी झालेल्या आवाजी मतदानात अजीव पाटील यांना 71 मते तर दर्शना कोटक त्रिपाठी यांना 44 मते मिळाली. त्यामुळे 27 मतांनी अजीव पाटील यांना विजय घोषित करण्यात आले असून त्यांची महापौरपदी निवड करण्यात आली.
उपमहापौर पदासाठीही निवडणूक पार पडली. या पदाच्या निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. यापैकी बहुजन विकास आघाडीचे कन्हैया भोईर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बविआचे मार्शल लोपीस आणि भाजपचे नारायण मांजरेकर यांच्यात लढत झाली. या लढतीत 71 मते मिळवत मार्शल लोपीस हे ख्रिस्ती समाजाचे दुसरे उपमहापौर ठरले.
वसई-विरार महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक गुप्त पद्धतीने व्हायला हवी होती. जर ही निवडणूक गुप्त पद्धतीने झाली असती तर ऑपरेशन शिट्टी काय असते ते दाखवले असते, असा टोला बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे. वसई-विरार महापालिकेच्या निवडणूक नुकतीच पार पडलेल्या निवडणूकीत बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 71 जागेवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले आहेे. तर महायुतीने 44 जागा जिंकल्या होत्या. या महापालिका निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकडे लागले होते. तर याच दरम्यान, भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवून बविआचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यातच आमची रणनीती काय आहे हे महापौर निवडणूकीच्या दिवशी कळेल असे वक्तव्य भाजप नेते आमदार राजन नाईक यांनी केल्यामुळे सर्वांचे लक्ष भाजपच्या भूमिकेकडे लागून होते. मंगळवारी वसई-विरार शहरात महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी महापौर पदी बविआचे अजीव पाटील व उपमहापौर पदी बविआचे मार्शल लोपीस यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी बविआचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महापालिका सभागृहात दाखल होत अजीव पाटील आणि मार्शल लोपीस यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपला देखील ऑपरेशन लोटसवरून टोला लगावला.
अजीव पाटील यांच्या निवडीबद्दल आप्पा, भाई यांना धन्यवाद! “माझा छोटा भाऊ अजीव यशवंत पाटील आता वसई-विरार महापालिकेचा महापौर झाला आहे. यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नाही. आमच्या कुटुंबासाठी आणि बहुजन विकास आघाडीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अजीव पाटील यांच्या निवडीबद्दल आप्पा, भाई आणि सर्व नगरसेवकांना धन्यवाद देतो! अजीव हा स्वतः इंजिनियर आहे. प्रशासकीय कामकाज आणि कायद्याची चांगली जाण आहे. सर्व पत्रकारांचा मित्र आहे. गेली तीस-पस्तीस वर्षे अप्पांसोबत सुखदुःखातही एक सच्च्या सहकारी आणि पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्याचे तोला-मोलाचे योगदान राहिलेले असून, आप्पांनी त्याला त्याच्या कार्याची पावती दिली आहे. त्याचा सर्वपक्षीयांशी सुसंवाद असून शहर विकासासाठी याचा त्याला योग्य वापर करता येईल. गेली पाच सहा वर्षे शहर विकासाची बिघडलेली घडी सावरण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य त्याला लागणार आहे. ते विरोधीपक्षियांसह सर्वांनी द्यावे“राजीव पाटील, माजी (प्रथम) महापौर, वसई विरार