

खानिवडे : पालघर जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या खरीप हंगामातील भात शेती नंतर रब्बी पिकं हंगामात काहीसा गोड्स आणि जास्त प्रमाणात कच्चाच खाल्ला जाणाऱ्या सफेद कांद्याच्या नकदी पिकाकडे जिल्ह्याभरातील शेतकरी आता वळले आहेत . उशिरापर्यंत बरसलेल्या पावसामुळे यंदा जमिनीत अतिरिक्त ओलावा निर्माण झाल्याने या कांदा पिकाची लागवड काहीशी उशिरा सुरू झाली .मात्र आता ती लागवड शेतातील वाफ्यांमध्ये हिरव्यागार पातींनी डोलू लागली आहे. बाजारात या कांद्याला चांगली मागणी आहे.त्यामुळे रब्बी हंगामात सफेद कांद्याची लागवड आता जिल्हाभरात होऊ लागली आहे.
या कांद्याची माळ तयार करून विकली जाते. दोन ते अडीच किलो वजनाच्या एका माळीमध्ये 30 ते 35 कांदे असतात तर काही माळा तीन किलोपर्यंत कांद्याच्या आकारमानानुसार असतात. चालूवर्षी नोव्हेंबर पर्यंत अधून मधून पाऊस होत राहिला . त्यामुळे जमीन सुकली नाही . त्याचा परिणाम पावसानंतर घेण्यात येणाऱ्या अनेक पिकांसह कांदा पिकांचीही लागवड साधारण महिनाभर उशिरा झाल्याने पीक उशिरा तयार होत आहे. आजही शेतात असलेल्या कांदा पिकाची पात हिरवीगार असून कांदा मध्यम तयार झाला आहे. येत्या महिन्याभरात कांदा पीक काढणीला येईल अशी शक्यता आहे अजूनही कांदा पिकांवर फारसा रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही .मात्र नकदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा भरोसा कमावलेल्या या पिकांवर बुरशी , करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो .
यासाठी पालघर कृषी विभागाचे अधिकारी यांनी कांद्यावर पडणारे रोग व त्यांवर उपाय काय करावे याविषयी उपयुक्त माहिती दिली आहे .तसेच रोगयुक्त कांद्याच्या रोपांची छायाचित्रे दिली आहेत .जी पाहून कांदा उत्पादकांना रोग व रोगनिदान करून रोगनियंत्रण करणे सहज सोपे होईल .आणि पर्यायाने उत्पादन वाढीस मदत होईल . जगातील सर्व देशांत जेथे कांदा होतो तेथे जांभळा करपा या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पिकाचे 50 ते 70 टक्के नुकसान होते. कांद्यावर पडणारे मर , रोप कुज किंवा करपा या रोगांनी उत्पादनावर मोठा परिणाम करू शकतात.
मर रोग किंवा रोप कोलमडणे ,बुरशी -स्क्लेरोशियम रॉलफ्सी बी पेरल्यानंतर रोप उगवून येते. रोप वाढत असतानाच या बुरशीचे दाणे रोपांच्या जमिनीलगतच्या भागातून शिरकाव करतात. या रोगामुळे रोपाचे 10 ते 90% पर्यंत नुकसान होते. लागवडीनंतर हा रोग कांद्याच्या शेतातदेखील मोठ्या प्रमाणात पसरतो. रोपे पिवळी पडतात.जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. पेरणीपूर्वी बियांना डायथायोकार्बामेट किवा कार्बोक्सीन हे औषध 2-3 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे. एवढे करून रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच तर दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन किवा कार्बोक्सीनचे द्रावण ओतावे. 20 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.