पालघर शहर : वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत अत्यल्प मोबदला प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणाशी गावातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. तणाशी येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मागण्यांची योग्य दखल घेत, समाधानकारक मोबदला न मिळाल्यास जमिनीबाबत भूसंपादनाची कोणतीही कार्यवाही देणार नाही असे तणाशी गावातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
प्रस्तावित वाढवण बंदर हे स्थानिक नागरिकांची गरजही नाही आणि मागणीही नाही. परंतु हे सर्व डावलून बंदर येथील लोकांच्या माथी मारण्यात येत आहे. व रेल्वे मार्ग हा प्रास्ताविक वाढवण बंदराचा भाग आहे. त्यामुळे अधिग्रहित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा त्याप्रमाणे त्यांना दर्जा देण्यात यावा. प्रकल्प बाधित शेतकरी हे सर्व पारंपारीक शेतकरी आहेत. जमिनीचे महत्व व वाढवण बंदरासाठी, त्याचप्रमाणे या परिसरातच चौथी मुंबई देखील होणार आहे.
प्रस्तावित महामार्ग हा जास्त लांबीचा नसून फक्त 32 किलोमीटर अंतराचाच आहे. त्यामुळे विकसित शेतकरी व त्याची शेतजमिन या प्रकल्पात आजन्म नष्ट होणार आहे. या परिसरातील रेडी रेकनर लक्षात न घेता येथील जमिनीला कमीत कमी रु.25 लक्ष प्रति गुंठा हा द्यावा, तसेच अधिग्रहण होणाऱ्या जागेचा 25 % जमीन विकसित क्षेत्रात द्यावी. जमिनीवर असलेल्या झाडाची किंमत ठरविताना आंबा, चिक्कू, फणस, नारळ, ताड़ इतर सर्व प्रकारचे उत्पन्न देणा-या झाडांना त्यांचे आयुर्मान न पाहता त्यांचे अस्तित्व पाहून प्रत्येकाला 2.2 लक्ष देण्यात यावेत.
सदर महामार्ग हा वाढवण बंदरासाठीच बनणार असून वाढवण बंदर प्रकल्पाचा अंदाजित खर्च हा 75000 कोटी पूर्णत्वास जाईपर्यंत 150000 कोटीच्या जाण्याच्या अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला मोबदला हा संपूर्ण प्रकल्प खर्चाच्या 1% सुद्धा नाही. त्यामुळे विकसित शेतक-यांकडून कायमस्वरुपी घेतल्या जाणा-या जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पासाठी होणा-या खर्चाच्या तुलनेत योग्य असा मोबदला द्यावा. अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
भूसंपादन होत असलेल्या गावापासून 10- 12 किलोमीटर च्या परिसरातील बोईसर ग्रामपंचायत व नगरपरिषद भागात सदनिकांचे दर हे प्रति चौरसफुट 6000- 7000 च्या आसपास पोहचले असून बाजार भाव 30 लाख प्रतिगुंठा सुरु आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अत्यल्प जाहीर झालेल्या मोबदल्यातून शेतकरी दुसरी जमिन खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याचे तणाशी गावातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी म्हटले आहे.