

वसई : वसई विरार शहर महानगरपालिका परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन लगत अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर मागील आठवड्यात त्या-त्या प्रभाग समिती मार्फत कारवाई करण्यात येऊन सदरचा परिसर मोकळा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विविध सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रहदारीची ठिकाणी, पदपथ इ. ठिकाणी अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत यांच्या मार्गदर्शनखाली महानगरपालिकेकडून दररोज कारवाई सुरु आहे. गुरुवारी प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत प्रभाग सहा.आयुक्त निलेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागामार्फत सातिवली खिंड ते वालीव फाटा, भोईदापाडा परिसर व मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येऊन अनधिकृतपणे उभारलेल्या स्टॉल, टपऱ्यांवर जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 41 टपऱ्या, 23 पत्राशेड, 25 बांबू शेड निष्कासीत करण्यात आले.
त्याचप्रमाणे प्रभाग समिती ‘बी’ अंतर्गत प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील राधाकृष्ण हॉटेल ते कारगिलनगर परिसरातील व मुख्य रस्त्यावरील अनधिकृतपणे उभारलेले स्टॉल, टपऱ्यांवर जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभाग सहा.आयुक्त श्रीम.अलका खैरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत टपऱ्या व स्टॉल पूर्णपणे तोडण्यात आले व परिसर मोकळा करण्यात आला. या कारवाईत एकूण 23 टपऱ्या, 09 बांबूशेड निष्कासीत करण्यात आले.
प्रभाग समिती ‘ई’ नालासोपारा अंतर्गत नालासोपारा पूर्वेकडील मुख्य रस्त्यावरील तसेच स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभाग सहा.आयुक्त विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येऊन परिसर मोकळा करण्यात आला.
वरीलप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरूच राहणार असून शहरातील नागरिकांना ये-जा करण्यास तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.