पालघर

Palghar flood news : मुसळधार पावसामुळे सफाळे बाजारपेठ जलमय; शेकडो दुकाने, घरे पाण्याखाली – जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

मुसळधार पावसामुळे दातिवरे, खार्डी आणि डोंगरे या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे

पुढारी वृत्तसेवा

सफाळे : परिसरात सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. सफाळे रेल्वे स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, मधुबन कॉम्प्लेक्स, बामणपाडा, शांतीनगर तसेच इतर अनेक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक दुकाने, घरे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दररोज पहाटे दोन ते सहा या वेळेत सफाळे बाजारपेठेतून रेल्वेमार्गे मुंबई व उपनगरांकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाते. मात्र, आज पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण बाजारपेठ जलमय झाली. बाजारपेठेकडे जाणारे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि व्यापारी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, सफाळे येथील बामणपाडा परिसरात एका चाळीत पाणी शिरल्याने वृद्ध दाम्पत्य भालचंद्र वर्तक आणि सुमती वर्तक हे घरात अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, परिसरातून वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे सुरुवातीला बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर आणि पाण्याचा वेग कमी झाल्यावर स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.

स्थानिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये कंबरभर पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शांतीनगरसह विविध निवासी भागांतील घरांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. घरातील जीवनावश्यक वस्तू, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे दातिवरे, खार्डी आणि डोंगरे या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एडवण ते प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) या मार्गावरही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून रुग्णांसह अत्यावश्यक सेवांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. याशिवाय कोरे–दातिवरे हा शॉर्टकट मार्गही पाण्याखाली गेल्याने बंद झाला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची ये-जा ठप्प झाली असून दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. सततच्या पावसामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने सायंकाळपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दरम्यान, सकाळी सुमारे दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मात्र, अनेक भागांमध्ये अद्यापही पाणी साचलेले असल्याने नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. नुकसानग्रस्तांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT