जुने नाशिक: पुढातसेवा
राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. त्या अनुशंगाने नाशिक एमआयएमच्या वतीने जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार (दि.3) ते बुधवार (दि.30) या दरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्विकारले जाणार असून चौक मंडई येथे एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष अहमद काजी यांच्या उपस्थितीत जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी संपर्कप्रमुख फरहान सय्यद, ॲड इकबाल खान, जावेद पंजाबी, सुलतान सय्यद, सचिन गायकवाड, सलीम शेख, अब्दुल्लाह अत्तार, मुजफ्फर कुरेशी, आबिद शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जुने नाशिकमध्ये अन्य भागांच्या तुलनेत बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याने अभियानास शहराच्या जुन्या भागाला प्राधान्य देण्यात आले आहे. तरुणांना संधी मिळावी या उद्देशाने अभियानास प्रारंभ करण्यात आला असून पोलीस भरतीसाठी जनजागृतीची संकल्पना हाती घेतल्यापासून अनेक मान्यवरांनी अभियानाचे स्वागत केले आहे. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांच्या आदेशानुसार हे अभियान हाती घेतल्याचे काजी यांनी सांगितले. कार्यक्रमास नाशिक काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष हनिफ बशीर, भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज शेख, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजीज पठाण, हसनैन फाऊंडेशनचे शकील तांबोळी, रक्तमित्र व ज्येष्ठ समाजसेवक नदीम मणियार, फैज बँक संचालक जुबेर हाश्मी, वसीम पठाण आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.