पुणे : आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, लोकांनी विश्वासाने निवडून दिले आहे. ते उत्तम आमदार असून काम चांगले आहे. लोकांसाठी त्यांनी राजिनाम्याचा निर्णय घेवू नये, त्यांनी लढले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या, त्या फ्रेममध्ये मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी आहेत. महिला जरी असली तरी तिची बाजू ऐकून घेणे गरजेचे आहे. राजकारणातील पातळी एवढी खालावली आहे का?
त्या पुढे म्हणाल्या, कायदा दडपशाहीचे नाही तर न्यायाचेसाधन व्हावे, असे सर न्यायाधिश म्हणतात, खोटे गुन्हे दाखल होणार नाही याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, हा केवळ आव्हाडांचा प्रश्न नसल्याचेही त्या म्हणाल्या. संविधानाच्या चौकटीत राहून प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. हा सर्व महिलांचा अवमान आहे. आव्हाडांवर खोटा गुन्हा दाखल केला असून कायद्याचा गैरवापर केला जातोय.
आरोप करा पण खोटे आरोप करू नका यामुळे कुटुंब उध्वस्त होतील. अशी वेळ भविष्यात कोणावरही येऊ शकते. अशा घटनांमुळे समाजाचे आणि महिलांचेही नुकसान होणार आहे. सर्वांनी यावर विचार करणे गरजेचे आहे. त्यांचे आमदार पोलिस ठाण्यात पिस्तुल घेवून जातात, मंत्रालयातील पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई नाही, मग आमच्या आमदारांवर का खोटे गुन्हे दाखल केले जातात. असा सवाल सुळे यांनी केला.
राठोड यांच्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, माझे तेव्हाही आणि आताही हीच मागणी आहे, याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. आज आम्ही विरोधात असलो तरी आम्ही राठोडांवर टिका करत नाही, तर चौकशी करावी, अशीच मागणी करत आहोत. या विषयांकडे संवेदनशिलपणे पाहणे गरजेचे आहे.
हरहर महादेव चित्रपट
इतिहासावर आणि छत्रपतींवर चित्रपट काढत असताना काल्पनीक घटना कशा दाखवल्या जातात. ऐतिहासिक चित्रपट एका चौकटीतच काढायला हवेत. चित्रपटात जी लढाई दाखवली, त्या लढाईची इतिहासात कुठेही उल्लेख नाही. चित्रपटात छत्रपतींचा एकेरी उल्लेख आहे. दोन्ही बाजूंच्या इतिहासकारांची खुली चर्चा ठेवावी, ही चर्चा पुराव्यावर आधारीत व्हायला हवी.