पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
रावण दहन करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाने देऊ नये तसेच ही प्रथा बंद करावी, अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांती दलाने निवेदनाव्दारे केली आहे.
राजा रावण हे आदिवासी समाजबांधवांचा देव असून रावणामध्ये विशेष गुणांचा समुच्चय आहे. मात्र रावणाला खलनायक म्हणून समाजातून प्रसिद्धी मिळाली आहे. आदिवासी समाजातील व इतरही समाजातील संशोधक, साहित्यिक यांनी राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून जगासमोर मांडला आहे. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्य प्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची असून बहुतेक राज्यात राजा रावणाची पूजा केली जाते. म्हणून रावण दहन कार्यक्रमावर बंदी आणावी. अशा मागणीचे निवेदन साक्री पोलीसांकडे एकलव्य आदिवासी क्रांती दलाने दिले आहे. विजया दशमीला रावण दहनाची परवानगी देऊ नये, कोणी तसा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यावेळी महेंद्र जगताप, नयन पवार, उमेश अहिरे, सुनील सोनवणे, रवींद्र माळी, रवींद्र पवार, शिवा जगताप, प्रदीप मोरे, अरुण पवार, कांतीलाल माळी आदी उपस्थित होते.