नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. २) ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यंदा नाशिक विभागाचा एकूण निकाल ९०.७२ टक्के लागला असून, नंदुरबार जिल्ह्याने ९४.६६ टक्के निकालासह विभागात अव्वल स्थान पटकावले, तर नाशिक जिल्ह्याचा निकाल ९३.४४ टक्के लागला. विभागात यंदा नाशिक जिल्हा दुसऱ्या स्थानी असून, गतवर्षीच्या तुलनेत निकाल २.१७ टक्क्यांनी घसरला आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिक विभागातून एकूण १,६२,९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६१,८१२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते, त्यातील १,४६,७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक जिल्ह्यातून ७७,२२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७६,७४८ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ७१,७२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक जिल्ह्याचा निकाल ९३.४४ टक्के लागला. विभागात नंदुरबारनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला. नंदुरबार जिल्ह्यातून १७,३४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७,२०३ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १६,२८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नंदुरबार जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वाधिक ९४.६६ टक्के लागला. धुळे जिल्ह्यातून २३,१९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२,९९३ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि २०,६२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धुळे जिल्ह्याचा निकाल ८९.६७ टक्के लागला. जळगाव जिल्ह्यातून ४५,१३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४,८७१ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ३८,१७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगाव जिल्ह्याचा निकाल ८५.०८ टक्के लागला.
विभागातील जिल्हानिहाय निकालाची टक्केवारी
नाशिक - ९३.४४
धुळे - ८९.६७
जळगाव - ८५.०८
नंदुरबार - ९४.६६
विभागाचा निकालही घसरला
विभागाचा निकाल यंदा ९०.७२ टक्के लागला असला, तरी तो मागील वर्षाच्या तुलनेत किंचित कमी आहे. २०२५ मध्ये ९१.३१ टक्के, २०२४ मध्ये ९४.७१ टक्के आणि २०२३ मध्ये ९१.६६ टक्के निकाल लागला होता. यामुळे यंदा निकालात थोडी घसरण झाल्याचे स्पष्ट होते.
निकाल पाहण्याची सुविधा
विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे. तसेच डिजिलॉकर ॲपवर डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयांना त्यांच्या लॉगिनद्वारे एकत्रित निकाल पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.
पुनर्मूल्यांकन व गुणपडताळणी
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. ३ ते १७ मे या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
सुधारणा परीक्षेची संधी
नियमित विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेंतर्गत पुढील तीन संधी देण्यात येणार आहेत. तसेच जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या पूरक परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे.