नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह ग्रामीण भागासाठी मार्च महिना आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा ठरला. यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्दी, पडसे, खोकला, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे देखील यानिमित्ताने फुल्ल झाल्याचे बघायला मिळाले. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मार्च महिन्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ३८.६ मिमी इतका अवकाळी पाऊस झाला. नाशिककर मार्च महिन्यात सर्दी, खोकल्याने चांगलेच हैराण झाले आहेत. आबालवृद्धांना सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागला आहे.