इंदापूर तालुक्यात एकाच तासात दोन अपघात; तिघांचा मृत्यू | पुढारी

इंदापूर तालुक्यात एकाच तासात दोन अपघात; तिघांचा मृत्यू

वालचंदनगर (ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : जंक्शन आणि शेळगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. ३ ) सकाळी नऊ वाजता जंक्शन येथे तर दहा वाजता शेळगाव येथे अपघात झाला. दोन्ही ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जंक्शन येथे कळस रस्त्यावरील खरजुलवस्ती परिसरात सकाळी नऊ वाजता टाटा इंट्रा व सायकलचा अपघात झाला. या अपघातात भरणेवाडी येथील मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे (वय अंदाजे ५२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. धातुंडे हे आपल्या सायकलने शेतातून घरी निघाले होते. खरजुलवस्ती दरम्यान पाठीमागून वेगाने आलेल्या टाटा इंट्रा गाडीने धातुंडे यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती मिळाली.

तर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती रस्त्यावर शेळगाव हद्दीत क्रेन (एमएच १४ सीएम ०७०९) व दुचाकी (एमएच ४२ यु २०१६) मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाबुराव जगन्नाथ कोकरे (वय ७०) व संजय रखमाजी कुंभार (वय ४९, दोघेही रा. टाकळी, ता. माढा, जि. सोलापूर यांचा मृत्यू झाला. यातील कोकरे हे पाटस येथील साखर कारखान्यातून निवृत्त झाले होते. त्यामुळे आपली पेन्शन काढण्यासाठी सकाळी दुचाकीवरून पाटसकडे निघाले होते.

शेळगाव येथून जात असताना समोरून येत असलेल्या क्रेन चालकाने क्रेन विरुद्ध दिशेने थेट अंगावर आणल्याने दुचाकी क्रेनखाली गेली. त्यामुळे अपघात होऊन त्यामध्ये कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर कुंभार यांना उपचारासाठी इंदापूर येथे नेले असताना त्यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अवघ्या एका तासाच्या फरकात केवळ पाच किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात तिघांना आपले प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button