नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शहरी आदिवासी वसाहतींमधील म्हणजे, विविध वाड्यावस्तांमधील दुर्लक्षित नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार आणि नवापूर पाठोपाठ शहादा शहरात घेतलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. 'मागेल त्याला मिळेल घर' आणि कला-कौशल्यावर गुजराण करणाऱ्यांना देणार पुरक साहित्य देण्याची घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.
शहरी आदिवासी वसाहतींमधील म्हणजे, नगरपालिका हद्दीतील विविध वाड्यावस्तांमधील दुर्लक्षित नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एखाद्या राजकीय नेत्याने संवाद करण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. शहरी आदिवासी वसाहतीतील बेघरांना घरे देण्याची सुद्धा महाराष्ट्रातील पहिली योजना यानिमित्ताने मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे आकाराला आणत आहेत.
आज वुधवारी ( दि. २० सप्टेंबर २०२३ ) रोजी शहादा येथील मीराप्रताप लॉन्स येथे आयोजित तालुक्यातील विविध वाड्यावस्तांमधील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, माजी नगरसेवक प्रशांत निकम, विजय पाटील, शशिकांत पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले की, आदिवासी बांधवांसह जिल्ह्यातील प्रत्येक बांधवाला घरकुल देताना 'मागेल त्याला मिळेल घर' हे धोरण अवलंबिले जाणार आहे. आधार कार्ड, शिधा पत्रिका, बँक पासबुक काढण्यासाठी येणार खर्च आदिवासी विभाग करणार आहे. पुढील महिन्यात महिला बचत गटांच्या सभा घेऊन त्यांना व्यवसायासाठी प्रशिक्षणासोबत अनुदान देऊन त्यांना व्यवसाय उभा करून बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
युवकांनाही व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायासाठी अनुदान दिले जाईल, बँड पथक, भजनी मंडळ, सोंगाड्या पार्टी आदिंच्या कलाकौशल्याच्या उभारी देवून त्यांना व्यवसायासाठी पुरक साहित्य दिले जाईल. रोजगारासोबत आदिवासी परंपरा व संकृतीचे जतन व्हावे या निमित्ताने प्रयत्न राहील, शहराच्या प्रत्येक वार्डात सोयी, सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील विविध वस्त्यांमधून आलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक व सामुहिक समस्या मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी ऐकून घेऊन ज्या समस्यांचे जागेवरच निराकरण केले आहे.
हेही वाचा :