जळगाव

Jalgaon rain update: जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; पालकमंत्री

शेतकरी, ग्रामस्थ व नदी काठच्या नागरिकांना सावधगिरीने राहून, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी नदी-नाले, ओढे तसेच लहान पुलांवरील पाण्याची पातळी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्थ,व सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा. पाण्याखाली गेलेले किंवा पाण्याचा वेग असलेले पूल, नदी-नाले, ओढे व रस्ते ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे त्यांनी आवाहन केले.

शेतकरी बांधवांनी शेतात काम करताना विशेष दक्षता घ्यावी. वीजेचे खांब, तुटलेल्या वीजवाहिन्या, पाण्याने वेढलेली ठिकाणे तसेच इतर धोकादायक परिसरापासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, महसूल, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, आरोग्य विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणांना २४ तास सतर्क राहून नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.

नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी; पालकमंत्री गुलाबराव पाटील

"आपण सर्वांनी संयम, सतर्कता आणि परस्पर सहकार्याची भावना जपली तर कोणत्याही संकटावर निश्चित मात करू शकतो. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि परिसरातील इतर नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वोच्च जबाबदारी मानून आवश्यक ती खबरदारी घ्यावी," असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT