जळगाव : "ज्या नेत्याने या भागाची, जिल्ह्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राची अहोरात्र सेवा केली, त्यांच्याबद्दल तुमच्या अंतकरणात अढळ स्थान असणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. जनसामान्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा आणि लोकांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारा असा हा कर्तृत्ववान नेता आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
नाथाभाऊंच्या ७५ व्या अमृत महोत्सवी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शरद पवार यांनी खडसेंच्या ५८ वर्षांपूर्वीच्या विधानसभेतील आठवणींपासून ते भाजप उभारणीतील त्यांच्या योगदानावर सविस्तर भाष्य केले.
विरोधी पक्षातील अभ्यासू नेतृत्व
"मी ५८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा विधानसभेत गेलो, तेव्हापासून सभागृहातील घडामोडी जवळून पाहिल्या आहेत. विधानसभेत विरोधी पक्षातील दोन नेत्यांची भाषणे मी अतिशय लक्षपूर्वक ऐकायचो. त्या भाषणांची छाप कायमस्वरूपी मनात राहिली आहे — पहिले उत्तमराव पाटील आणि दुसरे एकनाथराव खडसे! लोकांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडण्याची कला नाथाभाऊंकडे आहे."
भाजप रुजवण्यात मोलाचा वाटा
"ज्या काळात महाराष्ट्रात जनसंघ आणि भाजपचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते, त्या काळात हा पक्ष सामान्य जनतेत आणि गावखेड्यात रुजवण्याचे ऐतिहासिक काम ज्या नेत्यांनी केले, त्या यादीत नाथाभाऊंच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पूर्णच होऊ शकत नाही."
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सहकार्याचा निर्णय
"मधल्या काळात भाजप आणि नाथाभाऊंच्या विचारसरणीत अंतर पडले हे स्पष्ट दिसू लागले होते. शेतकऱ्यांचे दुःख आणि सामान्य माणसांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या अशा खंबीर नेत्याला सोबत घेतले पाहिजे, हाच विचार करून आम्ही नाथाभाऊंना आमच्यासोबत घेण्याचा निर्णय घेतला."
अखंड संघर्षाचा वारसा
"उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात नाथाभाऊंची ओळख ही लोकांसाठी झटणारा आणि संघर्ष करणारा नेता अशीच आहे. विरोधी पक्षात असताना शून्य प्रहारात हजारो प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारला धारेवर धरले, तर सत्तेत असताना विकासात्मक निर्णय घेतले." आपल्या अमोघ वक्तृत्वाने शरद पवार यांनी नाथाभाऊंच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा पट मांडत त्यांना भावी आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम शुभेच्छा दिल्या.