Gulabrao Patil Pudhari
जळगाव

Jalgaon news: माझा राजा पाठीशी अन्‌ जागा आहे, म्हणूनच मी निवडून येतो

गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी; महसूल दिनाच्या सोहळ्यात हास्यकल्लोळ

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : "ज्यांनी आयुष्यात पुण्य केलंय, तेच महसूल खात्यात आले आहेत! टंचाई असो, घर पडो, शेतात पाणी घुसो की बोगस बियाणे येवो... सगळीकडे तलाठीच लागतो," अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव केला. महसूल दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात आपल्या नेहमीच्या खणखणीत आणि खुसखुशीत शैलीत भाषण करत त्यांनी सभागृहात एकच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हास्यकल्लोळ उडवून दिला. राजकीय फटकेबाजी, प्रशासनाची कानउघाडणी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक अशा त्रिपेडी जुगलबंदीने गुलाबराव पाटलांनी महसूल दिनाचा कार्यक्रम चांगलाच गाजवला.

'वरच्या सभागृहाचे सदस्य नेहमीच डोक्यावर'

भाषणाची सुरुवातच पाटलांनी उपस्थित विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांना चिमटा काढून केली. "वरच्या सभागृहाचे सदस्य हे नेहमीच आपल्या डोक्यावर असतात," असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या काटेकोर आणि शिस्तबद्ध कारभाराचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

तहसील किंवा तलाठी कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकाला 'आपले काम होईलच' असा पक्का विश्वास असतो, याचे श्रेय त्यांनी 'आप्पा' म्हणजेच तलाठी व तिथल्या कर्मचाऱ्यांना दिले. "जिल्हाधिकाऱ्यांचे खरे भांडवल 'तलाठी आप्पा' असतात, तर आमचे भांडवल आमचे कार्यकर्ते आहेत," असे सांगत त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे ध्येय एकच म्हणजेच समाजसेवा असल्याचे स्पष्ट केले.

'तुमचे ६० पर्यंत, आमची उरली साडेतीन वर्षे'

प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमधील फरक सांगताना गुलाबराव म्हणाले, "अधिकारी तयार झाले की नाशिकला जातात, यावेळेस तर पीए पण सोडले नाहीत! तुमचे वयाची ६० वर्षे होईपर्यंत सुरक्षित असते, पण आमची तर आता साडेतीन वर्षेच उरली आहेत. परीक्षा लागली आहे, निवडून नाही आलो तर घरी बसावं लागेल. त्यामुळे आम्हाला रोज जनतेचा आणि शेतकऱ्यांचा बॅलन्स सांभाळावा लागतो."

आपल्या राजकीय प्रवासाची आठवण सांगताना ते म्हणाले, "राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक जेव्हा जळगावच्या कलेक्टर होत्या, तेव्हा मी पंचायत समिती सदस्य होतो. त्यावेळेस मी बाहेर उभा राहायचो, आता मात्र कलेक्टरच्या शेजारी बसतो! माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून मला आयुष्यात बॅलन्स कसा ठेवायचा हे शिकायला मिळाले."

'५२ हजार जीआर काढणारा पाणीपुरवठा विभाग'

आपल्या पाणीपुरवठा खात्याचा लेखाजोखा मांडताना पाटलांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. "पूर्वी आमचा विभाग राज्यभरात ८-९ व्या क्रमांकावर असायचा आणि केवळ ७०० ते ८०० कोटी खर्च करायचा. मात्र महसूल बदलले, मोदी बाबा आले, दाढीवाले बाबा (एकनाथ शिंदे) आले आणि आज हेच खाते ७० ते ७५ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत जेवढे जीआर निघाले, त्यात एकट्या पाणीपुरवठा विभागाचे तब्बल ५२ हजार जीआर आहेत!" असा दावा त्यांनी केला.

पाटलांच्या भाषणातील 'खास' टोलेबाजी

'हो' म्हणायची सवय ठेवा: "महसूल कर्मचाऱ्यांनी नागरिकांना जास्तीत जास्त 'हो' म्हणायला शिकावे. येणारा प्रत्येक माणूस आशेने येतो, त्याला त्रास देऊ नका. नाहीतर तुमचे अन् आमचे बीपी, शुगर सारखेच निघतील!"

तळागाळातील कर्मचाऱ्यांचा सत्कार: वाहनचालक, शिपाई, कोतवाल आणि पोलीस पाटील हेच शासनाचा खरा गाभा आहेत, म्हणूनच वाहनचालकाचा सत्कार करणे महत्त्वाचे ठरते.

बदलाची हवा: "पूर्वीच्या आणि आताच्या तलाठ्यांमध्ये बदल झालाय. आता आम्हालाही लॅपटॉप मिळाले आहेत, लॅपटॉपवरच प्रश्न येतात अन् तिथेच उत्तरे द्यावी लागतात."

छंद जोपासा: "कामाचा कितीही ताण असला तरी मी आजही गाणी म्हणायचा छंद जोपासतो, शेवटी हेच जीवन आहे."

"महसूल विभाग श्रेष्ठ, तर संपूर्ण जिल्हा फ्रेश"

"तुम्ही आमचा पराभवाचा आणि निरोप समारंभाचा काळ पाहिला आहे का? पडलो काय नि जिंकलो काय, आम्ही दोन्ही दिवस पाहिले आहेत. पण महसूल विभागाचे तसे नाही, तुमच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी नेहमीच कायम राहते. महसूल विभाग उत्तम चालला तर संपूर्ण जिल्हा फ्रेश राहतो", असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT