जळगाव : जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी जळगाव येथे महायुतीचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “जिल्ह्यातील ५४ अपक्ष सदस्य कोणत्याही पक्षाचे नसले तरी ते आपल्या विचारांचे आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
मेळाव्यात नगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, महायुतीच्या उमेदवाराला शंभर टक्के पाठिंबा मिळणार असून जिल्ह्यात सर्वाधिक मतदान होईल. विधान परिषद निवडणुकीनंतर नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांनी छोट्या नगरपरिषदांकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना उद्देशून आवाहन करताना सांगितले की, “१८ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान पूर्ण झाले पाहिजे. एकही मत बाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि तो या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध करून दाखवायचा आहे.”
महाजन पुढे म्हणाले की, जिल्ह्यात महायुतीकडे सुमारे ५५० मतांचे बळ असून सर्वांनी एकजुटीने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. “ज्या नगरपालिकेचे मतदान सकाळी १० वाजेपर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल, त्या नगरपालिकेला विशेष प्रोत्साहन देण्यात येईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले. मेळाव्यापूर्वी आदित्य लॉन्स येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची कोअर कमिटी बैठक पार पडली. त्यानंतर नगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात सर्वप्रथम बोलताना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महायुतीने तळागाळातील कार्यकर्त्याला प्रतिनिधित्वाची संधी दिल्याचे सांगितले. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जबाबदारी ओळखून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारा उमेदवार जळगाव जिल्ह्यातील असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुतीच्या बाजूने अनुकूल वातावरण असून १८ जूनची निवडणूक महायुतीचा विजय अधिकृत करणारी ठरेल. जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.