Dhule Sakal Maratha Samaj Protest
धुळे : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनातून सरकारच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत धुळ्यात मराठा समाजाकडून सलग दुसऱ्या दिवशी तीव्र आंदोलन करण्यात आले. बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नकाणे तलावात जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तालुका पोलिसांचे पथक सतर्क असल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
यानंतर गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेतून राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सरकारच्या कथित दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात भानुदास बगदे, विनोद जगताप, भैय्या शिंदे, मनोज ढवळे, विकास बाबर, आबा कदम, उल्हास यादव, दीपक रौंदळ, अॅड. दिनेश काळे, उल्हास पाटील, वामन मोहिते, कैलास वाघारे, प्रभाकर वाघ, रवींद्र नागणे, मुकुंद शिंदे, वीरेंद्र मोरे, सुरेश पवार, श्याम रायगुडे, प्रफुल्ल माने, संतोष लकडे, बाळासाहेब ठोंबरे, राकेश भोसले, नैनेश साळुंके, उज्वल वाळके, भानुदास चौधरी, श्रीरंग जाधव, अनिल बगदे, देसले बाबा यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
प्रतीकात्मक अंत्ययात्रेदरम्यान पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना धुळे शहर पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत आपल्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी सरकारला विविध आंदोलनांदरम्यान सहकार्य केले. सरकारनेही हैदराबाद गॅझेट लागू करून त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ५८ लाख कुणबी नोंदी आढळून आल्याचा दावा आंदोलकांनी केला.
मात्र, या नोंदींची दखल घेऊन अद्याप मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. सरकारकडून मराठा समाजाला केवळ आश्वासनांवर ठेवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण आणि आंदोलन सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.