उत्तर महाराष्ट्र

धुळे : मांडळ धरणातून पाणी सोडण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने मांडळ धरणातून बोरी नदीत 7.00 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या बैठकीत मांडळ धरणातून धुळे तालुक्यातील मांडळ, मोघण, रतनपुरा या गावांसाठी 7.00 दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आरक्षित पाणी सोडण्याची विनंती केली आहे. तर धुळे तहसीलदारांनी काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल सादर केला आहे. याशिवाय पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनीही पाणी सोडण्याबाबत अहवाल सादर केला आहे. तसेच मांडळ धरणातून आवर्तन सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 7.00. दशलक्ष घनफूट आरक्षित पाणी सोडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मांडळ धरणातील पाणी धुळे तालुक्यातील मांडळ, मोघण व रतनपुरा या गावांपर्यंत पाणी घेवून जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती), उपअभियंता वीज वितरण कंपनी, पोलिस निरीक्षक, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्तरीत्या राहणार आहे. पाटबंधारे विभागाने त्यांचे स्तरावर अधिकारी व कर्मचारी यांचे पथक स्थापन करुन या पथकाने नदीप्रवाहात अवैधरित्या पाणी अडविणे व पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी. पाणीपट्टीची रक्कम कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांनी पाटबंधारे विभागास जमा करून घेवून त्यानंतरच पाणी सोडण्याची कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT