बोधेगाव: शेेवगाव तालुक्यातील वाघोली येथील ग्रामपंचायतीने राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरावर बाजी मारत 50 लाख रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावले. पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी सोनल शहा, सरपंच सुश्मिता भालसिंग, उमेश भालसिंग, उपसरपंच कल्पना भालसिंग, हिराबाई शिंगटे व ग्रामसेविका जनाताई फटाले यांनी स्मृतिचिन्ह व मानपत्र स्वीकारले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुळीक, माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा समन्वयक रवींद्र ठाणगे आदी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक उपक्रमांची दखल
गेल्या दहा वर्षांत वाघोली ग्रामपंचायतीने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन, जलसंधारण, सौरऊर्जा व बायोगॅससारख्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, ग्रामस्वच्छता, जलजीवन मिशन आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करत गावाने जिल्हा व राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ग्रामविकासाचे संकल्पक उमेश भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या रचनात्मक कार्यामुळे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात सातत्य राखले आहे. यापूर्वी माझी वसुंधरा 2.0 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या हस्ते, तर माझी वसुंधरा 3.0’ मध्ये तत्त्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला होता. यंदा माझी वसुंधरा 4.0 मध्येही राज्यस्तरीय सन्मान मिळवत वाघोलीने हॅटट्रिक साधली आहे.
या राज्यस्तरीय पुरस्काराने लोकसहभागातून राबविलेल्या ग्रामविकासाच्या चळवळीवर शिक्कामोर्तब झाले आहे. हा पुरस्कार सर्व ग्रामस्थांचा सन्मान आहे. तसेच सातत्याने मार्गदर्शन करणारे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व गटविकास अधिकारी सोनल शहा यांचेही मोलाचे योगदान आहे.सुश्मिता उमेश भालसिंग, सरपंच, वाघोली