कोळपेवाडी : स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून आ.आशुतोष काळे यांनी सोनारी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी 20 लाखांचा निधी दिला होता. यातून उभ्या राहिलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी काल मंगळवारी माजी आ.स्नेहलता कोल्हे ह्या सोनारी येथे गेल्या असता, त्यांना काळे समर्थकांनी काळे झेंडे दाखवले. आ. काळेंच्या कामांचे कोल्हेंनी श्रेय घेण्याचा हा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, 2018 सालीही कोळगाव थडी येथील एका कामाच्या भूमिपूजनप्रसंगी कोल्हेंना अशाच प्रकारे काळे झेंडे दाखवल्याची आठवण विरोधक करून देताना दिसत आहेत.
कोपरगाव मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती बरोबरच सोनारी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत आ.आशुतोष काळे यांनी 2021-22 साली 20 लाख रुपये निधी दिला होता. या निधीतून पूर्ण झालेल्या इमारतीच्या कामात स्वत:चे कोणत्याही प्रकारचे योगदान नसताना माजी आ. कोल्हे यांनी उद्घाटन करण्यासाठी आल्या असता, त्यांना सोनारी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी स्नेहलताताई कोल्हे उद्घाटनासाठी आल्या असता, माजी सरपंच वसंत सांगळे, माजी उपसरपंच बाळकृष्ण कुटे, ग्रा.सदस्य चांगदेव घुगे, शांताराम सांगळे, विनोद कुटे, भाऊसाहेब सांगळे, भारत घुगे, रवींद्र सांगळे, मोहन सोनवणे, विठ्ठल घुगे,बाबासाहेब केकाण, संजय आघाव, नंदू सोनवणे, संतोष गायकवाड, बाळासाहेब सांगळे, बाळासाहेब आघाव, बाळकृष्ण आघाव आदी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवले.
चाळीस वर्षात सर्वप्रकारची सत्ता असताना कोल्हेंनी सोनारी गावाच्या विकासाकडे पाठ फिरविल्याचा आरोप केला जात आहे. या समस्या दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी 6 कोटी 69 लक्ष रुपये निधीतून सोनारी ते टाकळी रस्ता, 2 कोटी 39 लक्ष रुपये निधीतून सोनारी ते रवंदे रस्ता, 25 लक्ष रुपये निधीतून प्रजिमा 5 ते इजीमा 216 सहाचारी रस्ता (ग्रा.मा. 14) असे चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला असून काही रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी देखील 20 लाख रुपये निधी दिला होता. त्यामुळे या नूतन इमारतीचे उद्घाटन देखील आ. आशुतोष काळे यांच्याच हस्ते व्हावे, अशी सोनारी ग्रामस्थांची अपेक्षा होती.
परंतु नेहमीप्रमाणे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात आघाडीवर असणाऱ्या कोल्हे यांनी श्रेय घेण्यासाठी उद्घाटन केले असले तरी त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा त्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत.
दुसऱ्यांच्या कामांच्या उद्घाटनांसाठी कोल्हे सदैव पुढे
मागील सहा वर्षात कोपरगाव मतदार संघात झालेली विकासकामे त्या चाळीस वर्षात सुद्धा झाली नाही, याचे शल्य असणाऱ्या कोल्हेंनी नेहमीच आ.आशुतोष काळे यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानली. दुसरीकडे मात्र आ.आशुतोष काळेंनी आणलेल्या निधीतून झालेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी सर्वांच्या पुढे राहायचे, हि कोल्हेंची नेहमीच भूमिका राहिली आहे. मात्र जनता त्यांना आता फसणार नाही, अशी टीका ग्रामपंचायतीचे सदस्य चांगदेव घुगे यांनी केली.