Shrigonda Kolgaon Accident Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Kolgaon Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात; भावी नवरदेवासह चौघांचा मृत्यू

नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव शिवारात ट्रक-इको कारची धडक; लग्न ठरलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: लग्नाची बोलणी करून तारीख निश्चितीनंतर माघारी परतणाऱ्या भावी नवरदेवावर काळाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच घाला घातला. मालमोटार व इको कारच्या भीषण अपघातात चालक तरुणासह एकाच कुटुंबांतील तिघे अशा चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला. नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव शिवारात मंगळवारी (दि.24) पहाटे तीन वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.

चालक भावी नवरदेव नितीन कोकाटे (रा.काष्टी) गजानन जनार्धन पायधन (वय 47), दुर्पा गजानन पायधन (वय 36) आणि वैभव गजानन पायधन (वय 19, तिघे मळतूर ता.पातूर,जि.अकोला) अशी मृतांची नावे आहेत. करण गजानन पायधन हा तेरा वर्षाचा मुलगा गंमीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पायधन कुटुंब हे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावातील संतोष जाधव यांच्याकडे ते कामाला होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते. अकोलाहून सोमवारी रात्री ते चिंभळे येथे येण्यासाठी निघाले होते. कोळगाव शिवारातील माऊली मंदिर परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला. दौंड हून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच 12.डीटी 4633) हिने मारुती इको (एमएच 16 डीजी 8208) कारला जोराची धडक दिली. धडकेत ट्रकने इको कार जवळपास पन्नास फूट अंतर पुढे ढकलत नेली.

ट्रकचा बंपर कारमध्ये अडकल्याने मृतदेह आत अडकून पडले. बेलवंडी पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, दादासाहेब क्षीरसागर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकून पडलेले मृतदेह उपस्थित तरुणांच्या मदतीने बाहेर काढले. चारही जणांचे मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पसार झाला. मात्र बेलवंडी पोलिसांनी नगर शिवारातून त्याला ताब्यात घेतले आहे.

डुलकी लागल्यानेच झाला अपघात

प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार दौंडवरून नगरच्या दिशेने भरधाव ट्रकने राँग साईडला जात समोरून आलेल्या इको कारला धडक दिली. ट्रक चालकास झोप लागल्यानेच हा अपघात झाला. दरम्यान बेलवंडी पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला

बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कोकाटे आणि गजानन पायधन हे दोघे चिंभळे येथे एकत्र कामाला होते. गजानन पायधन यांच्या नात्यातील मुलीचे नितीनशी लग्न निश्चित करण्यात आले होते. लग्नाची बोलणी करण्यासाठी हे सर्वजण मळतूर येथे गेले होते. 22 एप्रिल ही विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र काळाने त्या अगोदरच हा घाला घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT