ना कोणता राजकीय वारसा, ना कोणी गॉडफादर; पण जनमानसाच्या मनाचा ठाव घेत हृदयी घर करणारा शिवाजीराव कर्डिले नावाचा वारा 1995 मध्ये नगरच्या राजकीय पटलावर अवतरला. अहिल्यानगरसारख्या सहकाराच्या बालेकिल्ल्यात हा वारा झंझावात कधी झाला हे मातब्बर प्रस्थापितांनाही कळले नाही.. सरपंच पदापासून सुरू झालेली कारकिर्द थेट मंत्रिपदापर्यंत पोहचली. कोणताही साखर कारखाना नाही, पण नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अन् दोनदा अध्यक्ष झालेले शिवाजीराव शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत साधे राहिले. डोक्यावरील गांधी टोपी शेवटपर्यंत त्यांच्या राजकारणाची ओळख राहिली. गावखेड्यातील शाळेत चार बुकं शिकलेला माणूसही राजकारण कसे फिरवू शकतो, हे शिवाजीरावांनी दाखवून दिले. राजकारणातल्या या ‘मास्टर’ची, किमयागार राजकारण्याची अकाली एक्झिट अनेकांना चटका लावून गेली...(Latest Ahilyanagar News)
संदीप रोडे
तारुण्याच्या काळात बुऱ्हाणनगरहून नगर शहरात घरोघरी दुधाचे रतीब घालणारे शिवाजीराव कर्डिले. स्वप्नातही कोणाला वाटले नसेल की ते इतकी मोठी राजकीय वाटचाल करतील. दूधवाला पैलवान असलेले शिवाजीराव हे 1984 ला बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीत निवडून आले. 12 वर्षे त्यांनी बुऱ्हाणनगरचे सरपंचपद भूषविले. या कार्यकाळात त्यांनी गावातच बाणेश्वर शिक्षण संस्थेची उभारणी केली. प्रत्येकाला आपला वाटणारा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली. मित्र परिवार आणि पाठिराख्यांचा गोतावळा इतका झाला, की त्याच गोतावळ्याने त्यांना मातीच्या आखाड्यातून 1995 च्या विधानसभा निवडणूक आखाड्यात उतरविले. तेव्हाच्या नगर उत्तर (नगर-नेवासा) मतदारसंघात ते 1995 मध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा विजयी झाले. 1999 मध्ये पुन्हा अपक्ष लढले अन् विजयी झाले. याच काळात त्यांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला अन् त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास आणि वन, जलसंधारण, महिला व बालकल्याण, मदत व पुनवर्सन यांसारखी खाती त्यांनी सांभाळली. 2004 ची विधानसभा निवडणूक ते राष्ट्रवादीकडून लढले अन् सलग तिसऱ्यांदा आमदार झाले. 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली अन् शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारसंघ म्हणून राहुरीची निवड केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपात गेले. भाजपकडून 2009 आणि 2014 असे सलग दोनदा त्यांनी राहुरीचे प्रतिनिधित्व केले. तिसऱ्यांदा 2019 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. पण ते शांत, संयमाने राजकीय आखाड्यात टिकून राहिले. त्यामुळेच विजय दृष्टिपथात नसतानाही (बहुमत नव्हते) राजकीय कसब पणाला लावत मार्च 2023 मध्ये ते नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची परतफेड 2024 ला करत ते सहाव्यांदा आमदार झाले.
नगर सहकाराचा बालेकिल्ला, तसाच मातब्बर राजकारण्यांचा जिल्हा. इथे नवख्या अन् तेही कोणताही राजकीय वारसा, गॉडफादर नसणाऱ्यांना सहकारातील धूरीण जमू देतील का? असा प्रश्न अनेकांना पडला असतानाच पायजमा, कुर्ता अन् डोक्यावर गांधी टोपी असा साधा पेहराव असणारे शिवाजीराव कर्डिले यांनी मात्र याच सहकार धुरिणांच्या पंगतीत स्थान मिळविले, टिकविले ते शेवटपर्यंत. त्यांच्या राजकारणाचा अदमास कोणाला कधी लागलाच नाही. ‘टोपी’खाली दडलंय काय? असे मिश्किलपणे त्यांच्याबाबतीत नेहमीच बोलले जायचे. पण त्या टोपीखाली असलेला ‘ब्रेन’ हुश्शार राजकारण्यांनाही पुरून उरला, तेही अगदी शेवटपर्यंत. शिवाजीराव कर्डिले यांनी राजकारण जरूर केले; पण कध़ी कोणाशी छक्के पंजे खेळले नाहीत. जे असेल ते बेधडक आणि जाहीरपणे सांगून केले. काम होणार असेल तर लगेच अन् नसेल तर तसे रोखठोक सांगणारा असे हे लोकनेतृत्व होते. पण मनात एकदा ठरविले की ते करायचेच, असा नेहमी त्यांचा चंग असायचा, नव्हे तर ते करूनही दाखवत. 2023 च्या जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लागली, तेव्हा भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांनी उमेदवारी केली. विरोधकांचे संख्याबळ पाहता कर्डिले यांचा पराभव अटळ होता. शिवाय प्रतिस्पर्धी उमेदवार साखरसम्राट; पण कर्डिले यांनी जादूची कांडी फिरावी तशी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. ‘टोपीखालच्या ब्रेन’ने विरोधकांची चार मते फोडल्याने अनेकांना घाम फुटला होता. आजही त्याची आठवण होते. त्यांच्या याच ‘ब्रेन’ची अनेक प्रस्थापितांना धडकी भरायची, ती यामुळेच.
‘सोधा’ पक्षाचे प्रवर्तकही तेच. कधीकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी भानुदास कोतकर अन् त्यानंतर स्व. अरुणकाका जगताप यांच्याशी सोयरिक करण्याची किमया केली ती याच कर्डिले यांनी. त्यांनी सामान्य नागरिकांना कधीच अंतर दिले नाही; पण त्याचबरोबर राजकारणात दगाफटका करणाऱ्यांनाही सोडले नाही. एकदा त्यांच्या मनात ठरले की ते झालेच म्हणून समजा, मग ती किती अशक्य गोष्ट असली तरी शक्य करण्याची जादुगरी त्यांच्याकडे होती. हाती पॉवर असतानाही त्यांनी मात्र कधी त्याचा अतिरेक केला नाही. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर अनेकांनी अनेक आरोपास्त्रे फेकली; पण ते डमगगले नाहीत. शांत, संयमाने त्यातून मार्ग काढत ते सहीसलामत बाहेर पडले. विरोधकांनी किती पातळी सोडली तरी त्याला प्रत्युत्तर न देता ते संयमाने परिस्थिती हाताळत असल्याचे अनेकांनी पाहिले, अनुभवले. त्यामुळेच ते कोणत्याही पक्षात असले तरी त्या पक्षाचे राजकारण त्यांच्याभोवती फिरत असे, नव्हे ती किमया कर्डिले यांनी साधली होती.
कालपर्यंत समाजसेवेचा वसा घेतलेले शिवाजीराव कर्डिले अनेकांना भेटले, प्रश्न सोडविले. आज अचानक त्यांच्या अकाली निधनाची बातमी अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. शिक्षणाची चार बुकं कमी पण राजकारणाची चार बुकं जादा शिकलेले शिवाजीराव कर्डिले आज आपल्यात नाहीत, हे कोणालाही सहजासहजी अस्वीकारार्ह आहेे. पण नियतीपुढे कोणाचे काहीच चालत नाही, असे म्हणतात, ते खरेच...भावपूर्ण श्रद्धांजली!
शशिकांत पवार
मतदारसंघ पुनर्रचनेत 2009 मध्ये नगर तालुक्याचे त्रिभाजन झाले. शिवाजीराव कर्डिले यांचा हक्काचा मतदार संघ संपुष्टात आला. आता राजकारण संपले असते वाटत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली. मावळलेल्या आशा पल्लवीत झाल्या, पण कर्डिले खासदार झाले तर जिल्ह्याचे नेतृत्व करतील, अशी भिती प्रस्थापितांना वाटली. त्यातूनच मग सगळ्यांनी मिळून कर्डिले यांचा पराभव केला. प्रचंड निराश झालेल्या कर्डिले यांनी राजकारणातून बाजूला व्हायचा निर्णय घेतला. पण कार्यकर्त्यांनी आग्रह धरला अन् ‘राहुरी’चा पर्याय सूचविला. तेथून विजयाची खात्री नसल्याने ते नाऊमेद झाले. पण कार्यकर्त्यांच्या पाठबळावर त्रिभाजनातही संधी शोधत त्यांनी ‘राहुरी’त एन्ट्री केली. ‘अशक्य’ शब्द डिक्शनरीत नसलेल्या कर्डिले यांनी तेथेही विजय मिळविला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. सलग दोनदा आणि 2024 ला पुन्हा अशा तीन वेळेस त्यांनी ‘राहुरी’चे मैदान मारले.
पुनर्रचनेत मतदारसंघ संपुष्टात आल्यानंतर कुठूनही उभा रहा, हक्काचा आमदार पाहिजे म्हणून कार्यकर्ते आग्रह करत होते. हक्काच्या तालुक्याची फक्त 20 टक्के आणि दुसऱ्या तालुक्याची 80 टक्के मते, कसे निवडून येणार?, असे कर्डिले कार्यकर्त्यांची समजूत काढत होते. पण कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. कार्यकर्त्यांनीच मग राहुरी मतदारसंघाचा पर्याय समोर ठेवला. पण तेथून राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली. दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची उमेदवारी दिली. प्रचार प्रारंभ झाला. जिरायती भागाच्या पाठबळावर कर्डिले यांनी ‘अशक्य गोष्ट शक्य’ करून दाखवली. ते राहुरीचे आमदार झाले.
चार/चार वेळा निवडून येतो. लोकात राहतो, हा खूप जड जाईल म्हणून त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला. अनेकदा ते निराश झाले. नको आता राजकारण असं त्यांना वाटायचे. मात्र लोकांनी सतत त्यांची उमेद, उत्साह वाढवला. सहकाराची कामधेनू असलेल्या नगर जिल्हा बँकेचा चेअरमन होण्याचा बहुमानही आणि नगर-नेवासा मधुन तीनदा तर राहुरीतुन तीनदा आमदार झाले.
अतिशय साध्या कुटुंबात कर्डिले यांचा जन्म झाला. घरात कुणीच राजकारणात नव्हते. शेतीत राबायचे आणि कुटुंबाचा गाडा हाकायचा, असे कर्डिले कुटुंबाचे सूत्र होते. परिस्थितीमुळे शिक्षण आटोपते घ्यावे लागले. घरच्या गायी-म्हशीचे दूध नगर शहरात विक्रीसाठी न्यायची जबाबदारी शिवाजीराव कर्डिलेवर आली. शहरातील मोठ मोठ्या अधिकाऱ्यांनाही दूध घालत असताना त्यांची महसूल, पोलिस, पाटबंधारे, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी परिचय झाला. त्यातील काहींशी अत्यंत जवळीक बनली. गावात कुणाचे काहीही काम असले की, लोक शिवाजीरावांकडे यायला लागले. आसपासच्या गावातील दूधवाले एकत्र असायचे. त्यांच्याही अडचणी व कामे घेऊन ते या अधिकाऱ्यांकडे जायचे. दूध धंद्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी झालेल्या ओळखीचा फायदा घेत ते लोकांची कामे करत गेले. त्यातूनच ‘कामाचा माणूस’ अशी त्यांची प्रतिमा बनत गेली. समाजकार्यात ते कधी ओढले गेले याचा त्यांनाही थांगपत्ता लागला नाही. खरं तर त्यांना लोकांची कामे करण्याची आवड तेथून सुरु झाली. ग्रामीण भागातील दूधवाल्यांना संघटीत करत ते सखासोबती झाले.
1984 मध्ये बुऱ्हाणनगर गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली. या निवडणुकीत लोकाग्रहामुळे शिवाजीराव यांच्यासह नऊ जणांना बिनविरोध निवडण्यात आले. गावकऱ्यांनीच सरपंचपदी बसवले. हीच संधी मानत कर्डिले यांनी गावातील मतभेद मिटवत विकास कामांना प्रारंभ केला. ‘कार्यक्षम सरपंच’ म्हणून अल्पावधीच नावलौकीक झाला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले. दूध उत्पादक मित्रांनी जेऊर गटातून काँग्रेसकडून उभं राहावं असा आग्रह धरला. कार्यकर्ते उमेदवारीसाठी दादा पाटील शेळके यांच्याकडे गेले. त्यांनी उमेदवारी देण्याचे कबुलही केले. मात्र ऐनवेळी कर्डिले यांना डावलून दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. सगळे जण नाराज झाले. यापुढे त्यांच्या विरोधात राजकारण करण्याची भूमिका त्यांनी घेतली. तेव्हापासून दादा पाटलांशी त्यांचा राजकीय संघर्ष सुरु झाला. नंतर तालुका विकास आघाडी तयार केली. रोहिदास मगर, पोपटराव पवार, रामदास आव्हाड, माधवराव लामखडे, डॉ. बोरुडे असे सर्वजण कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली लढले. तालुक्यात कुठलाच राजकिय प्रभाव नसताना चांगले यश मिळाले. कर्डिले यांचा हुरूप वाढला. नंतर नगर मार्केट कमिटीची निवडणूक लागली. त्यात वाद झाला. कर्डिले यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यातुन अटक झाली मात्र लोकांमध्ये कर्डिले यांच्या बाबत सहानुभूती निर्माण झाली. आता मात्र सर्वजण पेटले. 1995 ला नगर-नेवासा मधून कर्डिले अपक्ष म्हणून उभे राहिले. अनेकांनी त्यांना मदत केली अन् ते पहिल्यांदाच अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.
1995 मध्ये युती सरकारला 40 अपक्ष आमदारांनी पाठिंबा देण्याचे ठरवले. त्यावेळी मंत्रीपद नाकारून त्यांनी बुऱ्हाणनगर पाणी योजना, घोसपुरी पाणी योजना, शनि शिंगणापूर पाणी योजना व इतर विकास कामांना मंजुरी मिळवून घेतली. तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरु केला. लोकांना जो शब्द दिला तो त्यांनी पाळला. जे कामे गेली 25 वर्षे झाली नाहीत ती मी फक्त 5 वर्षात त्यांनी करून दाखवली. लोकांचा विश्वास त्यांच्यावर आणखी वाढला. 1999 ला युतीने त्यांन पुरस्कृत म्हणून उभे केले.
पाच वर्षांच्या कामाची पावती म्हणुन मतदारांनी पुन्हा त्यांना पुन्हा संधी दिली. मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. लग्न, अत्यंविधी, दशक्रिया विधी अशा सुख-दुःखाच्या कार्यक्रमांना जाऊ लागले. लोकांत मिसळून त्यांची मने जिंकली. त्यामुळे मोठा जनसंपर्क वाढला. 1999 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली. मंजूर पाणी योजना व इतर कामे रखडली. मग आघाडीला पाठिंबा दिला. आर.आर. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट घातली. सर्व रखडलेल्या कामांना निधी मिळाला. अपूर्ण कामे तर पूर्ण झालीच पण तालुक्याचा चेहरा-मोहराही बदलला. अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेत त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. एक सर्वसामान्य दूधवाला मंत्री झाला. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. पण त्याचवेळी ते जिल्ह्यातील प्रस्थापित पुढाऱ्यांच्या डोळ्यात खुपायला लागले. मंत्रीपद भेटूनही त्यांच्यात मंत्रीपदाची हवा शिरली नाही. त्यांनी जमिनीवर पाय ठेवूनच लोकांशी संपर्क व कामे करण्याचा धडाका सुरुच ठेवला, तो शेवटच्या श्वासापर्यंत.