शिर्डी: अनुसूचित जाती आरक्षणाचे 'अ, ब, क, ड' असे उपवर्गीकरण करून त्याची राज्यात तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, या आग्रही मागणीसाठी शिर्डी येथे सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राज्याच्या विविध भागांतून आलेले मातंग बांधव, महिला व कार्यकर्ते या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप हा निर्णय लागू करण्यात आलेला नाही, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
‘आम्ही कोणाच्याही हक्काचे हिरावून घेत नसून, न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाच्या निर्णयानुसार खऱ्या वंचित घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचावा, यासाठीच हा लढा देत आहोत,’ असे गोरखे यांनी स्पष्ट केले.
उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात झालेला हा ७६ वा मोर्चा आहे. जोपर्यंत सरकार यावर ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असा इशारा देत येत्या २९ तारखेला मुंबईत महामोर्चा काढण्याचे त्यांनी जाहीर केले.