Mula Dam Pudhari
अहिल्यानगर

Mula Dam Water Crisis: मुळा धरण पाणीसंकट तीव्र; वीजपुरवठा बंदीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचा रोष

रोहित्रे बंद करण्याच्या हालचालींमुळे उभी पिके धोक्यात; प्राजक्त तनपुरेंची प्रशासनाकडे तातडीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: मुळा धरणातील घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पाणी बचतीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, धरण परिसरातील विजेची रोहित्रे बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे राहुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन उन्हाळ्यात उभ्या पिकांसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेतली आहे. “उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणे म्हणजे शेती उद्ध्वस्त करण्यासारखे आहे,” अशी भूमिका घेत त्यांनी जलसंपदा विभागाला निवेदन देत वीजपुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी केली.

डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक किसनराव जवरे, प्रगतशील शेतकरी बाबासाहेब सोनवणे यांच्यासह विविध गावांतील शेतकऱ्यांनी तनपुरे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर तनपुरे यांनी तातडीने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचाळे, कुरणवाडी, गडदे आखाडा, मल्हारवाडी, जांभळी, जांभूळबन, वावरथ, घोरपडवाडी, बाभुळगाव व खडांबे येथील शेतकऱ्यांनी मुळा धरणातून पाइपलाइनद्वारे शेतीसाठी पाणी उचलण्याची व्यवस्था केली आहे. या भागात तब्बल 220 विजेच्या रोहित्रांद्वारे सुमारे दीड हजार शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करतात.

मात्र, धरणातील उपलब्ध पाणी राखीव ठेवण्याच्या भूमिकेतून जलसंपदा विभागाने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच कडाक्याच्या उन्हामुळे पिके करपत असताना वीजपुरवठा बंद झाल्यास शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, “पावसाळा सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना धरणातील पाणी उचलण्यास आडकाठी करू नये. वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा,” अशी मागणी प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

विजेच्या धास्तीने शेती उद्ध्वस्त!

वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. उन्हामुळे पिके करपत असताना वीजपुरवठा बंद झाल्यास शेती उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT