शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप! Pudhari
अहिल्यानगर

Government Relief: शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप!

राहुरीतील 54 हजार शेतकऱ्यांना 107 कोटींची मदत; शासनाच्या निर्णयाने दिवाळीपूर्वी उजेड पसरला!

पुढारी वृत्तसेवा

रियाज देशमुख

राहुरी: गेल्या महिनाभरापूर्वी राहुरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले. हातातोंडाशी आलेले कापूस, सोयाबीन, मका, कांदा, तूर, भाजीपाला आणि फळबागांचे हिरवे स्वप्न पाण्यात वाहून गेले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला शासनाने मदतीचा हात देऊन त्याच्या जीवनात पुन्हा आशेचे दीप पेटविण्याचा प्रयत्न केला आहे. मदतीचा निर्णय होताच शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारल्याने बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे. (Latest Ahilyanagar News)

राहुरी तालुक्यातील 53 हजार 810 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अंतिम अहवाल शासनाने स्वीकारला आहे. तहसीलदार नामदेव पाटील, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे आणि गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी आणि पंचायत समिती प्रशासनाने दिवसरात्र मेहनत घेत नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण केले. तालुक्यातील एकूण 42 हजार 142 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

त्यात कापूस 25,012 हेक्टर, सोयाबीन 8,683 हेक्टर, कांदा 3,100 हेक्टर, मका 2,071 हेक्टर, तूर 310 हेक्टर, फळबागा 1,020 हेक्टर, भाजीपाला 82 हेक्टर आणि इतर पीके जवळपास 5 हजार हेक्टर क्षेत्रावर बाधित झाली. या नुकसानीचा एकूण 107 कोटी रुपयांचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून, त्यात अतिवृष्टीमुळे बाधितांना 65 कोटी व रब्बी हंगामासाठी 42 कोटींचा निधी प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने कोणत्याही क्षणी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अतिवृष्टीने शेतकऱ्यांची सर्वाधिक नुकसान झाले. सर्वत्र पाणीमय परिस्थिती झाल्यानंतर हातातोंडाशी आलेल्या कापूस पीकालाही दर मिळेनात. साठवणुकीचा खर्च होऊनही कांदा कवडीमोल झाला.

एकीकडे अतिवृष्टीने दिवाळ सण अंधारात असताना दुसरीकडे कापसाच्या दराच्या वातेला ओलावा लागला. परिणामी दर कोसळलेला कापूस व कांदा पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. परंतु शासनाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांची मदत जाहिर केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अपेक्षित रक्कम जमा होईल अशी अपेक्षा लागलेली आहे.

दिवाळीची खरी गोडी शासनाच्या मदतीत: मोरे

राहुरी शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठेत नवसंजीवनी आणली आहे. दीर्घकाळ ओलसर मनाने जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता आशेचा उजेड दिसू लागला आहे. दिवाळीपूर्वी हा निधी मिळाल्यास शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा एकदा प्रकाश फुलणार आहे. या दिवाळीत खरी गोडी गुळात नव्हे, तर शासनाच्या दिलाशात आहे, अशी भावना सेना शिंदे गटाचे शेतकरी नेते रविंद्र मोरे यांनी व्यक्त केली आहे.

जनतेची काळजी घेणारे युती शासन: गाडे

राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती शासनाने प्रत्येक वेळी आपली जबाबदारी पार पाडली आहे. जनतेला नेहमीच संकटात मदत करणार्या युती शासनाने शेतकर्यांना दिवाळी सणाला भेट देत नुकसानीचा निधी देण्याचा निर्णय घेतला. युती शासनामुळे शेतकर्यांना दिवाळी सणाला सहकार्य होणार असल्याचे राहुरी तालुका मंडल प्रमुख युवराज गाडे यांनी सांगितले.

कर्जमाफीचा शब्द पाळणे गरजेचे: सागर तनपुरे

महायुती शासनाने अनेक फसव्या घोषणा करून सत्ता मिळवली. शेतकर्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविले. दिवाळी सणापूर्वीच नुकसानग्रस्तांचा निधी जमा होणे महत्वाचे होते. राज्यात नैराश्याच्या गर्तेत असलेल्या शेतकर्यांना तुटपुंजी मदत देऊन जाहिरातबाजी करणार्या युती शासनाने कर्जमाफीची घोषणा करून शेतकर्यांचे अश्रृ पुसावे अशी मागणी राहुरीचे माजी नगरसेवक तथा केशरबाई उद्योगसमुहाचे सागर तनपुरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT