राहुरी: उमेदवारी अर्जाच्या छाननीत 7 अर्ज बाद ठरले तर एकाने पहिल्याच दिवशी माघारही घेतली. त्यामुळे राहुरी विधानसभेच्या पोटनिडणुकीत 22 उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. गुरुवारी (दि.9) माघारीचा अंतिम दिवस असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या 30 उमेदवारांच्या अर्जांची मंगळवारी (दि.7) छाननी झाली. त्यात 7 अर्ज बाद झाले. छाननीनंतर एका उमेदवाराने लगेच माघार घेतली. त्यामुळे आता 22 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिली.
भाजप आ. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर होत असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे हा नवखा चेहरा समोर करत निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिला आहे.
भाजपने दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात 22 इच्छुकांनी अर्ज दाखल केले असले तरी माघारीपर्यंत काय काय घडामोडी घडतात, यावर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीप्रमाणेच वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलून देवळाली प्रवराचे नगरसेवक संतोष चोळके यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शिंदे सेनेचे रवींद्र मोरे व सविता राजेंद्र शेटे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
यांचे अर्ज बाद
उमेश महादेव म्हैत्रे, दत्तात्रय नारायण म्हैस, त्रिशला मिलिंद कांबळे, शिवाजी आनंदा कदम, नंदकुमार भागवत खेमनर, सोहम बापुसाहेब चिंधे, शोएब सुभेदार शेख यांचे अर्ज बाद झाले. तर प्रवीण सुभाष दळवी यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी उमेदवारी न करण्याची सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता तेच निवडणूक रिंगणात नसल्याने राहुरीच्या अस्मितेसाठी निवडणूक लढविणारच आहे.रावसाहेब खेवरे