नगर: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प 2019 च्या मूळ प्रस्तावित आराखड्यानुसार संगमनेर-अकोले मार्गेच कार्यान्वित करावा, अशी मागणी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून, जनतेच्या भावना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय रेल्वे विभागाने 2019 मध्ये तयार केलेल्या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग नारायणगाव, संगमनेर, अकोले व सिन्नर असा प्रस्तावित होता. या नियोजनानुसार संबंधित भागातील जमिनींचे अधिग्रहणदेखील करण्यात आले होते. मात्र, सध्या या प्रस्तावात बदल करून अकोले तालुक्याला वगळण्यात आल्याचे व हा मार्ग आता नारायणगाव-संगमनेर-नाशिक असा प्रस्तावित असल्याचे समोर आले आहे. या बदलामुळे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रकल्पामध्ये बदल करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नसल्याची बाब विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
सद्यःस्थितीत रेल्वेमार्गाबाबत नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे, याची माहिती उपलब्ध होत नाही. तसेच, पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गात नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ (ॠचठढ) या रेडिओ टेलिस्कोप सेंटरची तांत्रिक अडचण असल्याचे कारण केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेतील निवेदनात स्पष्ट केले आहे. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन, प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी. तसेच, 2019 च्या मूळ प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व जनतेच्या भावना रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती विखे पाटील यांनी केली.
2019चा प्रस्ताव कोणी बदलला?: विखे पाटील
अकोले ः दरम्यान, देवठाणमार्गे (ता अकोले) रेल्वेमार्ग नेण्याचा 2019चा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणी बदलला हे जनतेला कळू द्या, असा सवाल करत पालकमंत्री विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टीका केली. देवठाण येथे विकासकामांचे उद्घाटन करताना ते म्हणाले, की चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाणमार्गेच नेण्याचा मी शब्द देतो. खरे तर नाशिक-पुणे रेल्वेबाबत रेल्वेमंत्र्यांनी संसदेत केलेल्या निवेदनानंतर विखे पाटील यांनी या प्रकल्पावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले. ते म्हणाले, की स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी रेल्वेच्या प्रश्नावरून काहींनी शिट्या वाजवायला सुरुवात केली आहे.
मात्र जनता त्यांचा भोंगा वाजवल्याशिवाय राहणार नाही. सध्या कोण कोणत्या रेल्वेच्या डब्यात बसले आणि कोणत्या डब्याला कोणाचे इंजिन जोडले, हे समजायला तयार नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. देवठाणहून जाणारा प्रस्तावित रेल्वेमार्ग 2021 साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणी बदलला हेसुद्धा पाहा. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण मंत्री होते, 2019 मध्ये तयार केलेला प्रस्तावित मार्ग कोणी बदलला या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी थोरात यांना जणू आव्हान दिल्याचे मानले जात आहे.