संगमनेर: नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्टला क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी सर्वत्र चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा आ. सत्यजीत तांबे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
नाशिक-पुणे सरळ रेल्वेबाबत आग्रही मागणी व आंदोलनाबाबत माहिती देताना आ. सत्यजित तांबे म्हणाले, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही.
नाशिक-पुणे दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण, होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिक दरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे.
सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकणसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या सरळ रेल्वे मार्गासाठी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे- नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो, असे आ. तांबे यांनी सांगितले. हे आंदोलन नाशिक-पुणे दरम्यान चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक, अशा विविध ठिकाणी एकाच वेळेस ९ वाजता होणार आहे.
क्रांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात या मार्गाच्या सर्व मंजुऱ्या या पूर्ण होऊन अनेक शेतकऱ्यांना सुमारे ६५० कोटी रुपये वितरितही केले आहे. या महामार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची एकत्र बैठक घेऊन मुख्यमंत्री केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडेही पाठपुरावा केला आहे. मात्र आता या महामार्गासाठी क्रांती दिनी क्रांती करण्यासाठी सर्वांनी एकत्र, या असे आवाहनही केले आहे.