राहुरी: पाणलोटात सुरू असलेल्या दमदार पावसाने मुळा धरणातील पाणीसाठा बुधवारी (२९ जुलै) सायंकाळी १७४२४ दशलक्ष घनफूटावर पोहचला. धरणाची पाणीपातळी १७९५.२० फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. कोतूळ येथून ५६३८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने धरण जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
यंदाच्या मान्सूनच्या प्रारंभी मुळा धरणातील जलसाठा अत्यल्प होता. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्यानंतर परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. अवघ्या महिनाभरात धरणाच्या साठ्यात १० टीएमसीहून अधिक पाण्याची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी धरणाचा साठा ५८ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतरही पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
सध्या धरणाच्या सांडव्याद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. उजव्या कालव्यातून (एमआरबीसी) ५० क्युसेक इतकाच विसर्ग सुरू असून डाव्या कालव्यातून (एमएलबीसी) पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा मोठा भाग जलसाठा वाढविण्यासाठी राखून ठेवण्यात येत आहे.
सातत्याने प्रवाह सुरू
गत चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात ७५४ दशलक्ष घनफूट पाण्याची भर पडली. मंगळवारी सायंकाळी धरणातील साठा १६६७० दशलक्ष घनफूट होता, तो बुधवारी सायंकाळी १७,४२४ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला. पाणीपातळीतही १.७५ फूट वाढ झाली आहे. आवक मागील दिवसाच्या तुलनेत काहीशी कमी झाली असली, तरी सातत्याने सुरू असलेला प्रवाह धरणाच्या भरावाकडे वाटचाल अधिक वेगवान करीत आहे.