राहुरी: नगर दक्षिणेसाठी जलसंजीवनी बनलेल्या मुळा धरणात यंदाही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तप्त लाहीत जमिनीचा कंठ कोरडा पडण्याआधीच मुळाच्या अथांग साठ्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सध्या धरणात तब्बल 21 हजार 654 दलघफू म्हणजेच 83.28 टक्के पाणीसाठा शिल्लक असून हा साठा केवळ आकडा नसून तो उन्हाळ्यातही शेतीपिकांसह लाखो नागरीकांची तहान भागविणारा आशेचा झरा आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेचा जलस्रोत म्हणून मुळा धरण ओळखले जाते. हजारो हेक्टर शेती क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे. नगर शहराची पिण्याच्या पाण्याची गरज, औद्योगिक वसाहतींचा पाणीपुरवठा, राहुरी व देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांची तहान तसेच राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेकडो गावांचा जीवनप्रवाह-हे सर्व या एका धरणाच्या साठ्यावर उभे आहे. त्यामुळे मुळा धरण केवळ जलाशय नसून नगर दक्षिणेची जीवनरेखा, अर्थकारणाचा कणा आणि शेतीचा आधारस्तंभ ठरते.
नुकतेच रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. डाव्या व उजव्या कालव्यांतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने कोरड्या मातीत पुन्हा हिरवाईची चाहूल दिली. वांबोरी चारीमार्गे पाणी पोहोचल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. मात्र, धामोरी स्टेशनजवळ वांबोरी चारी फुटल्याने त्या भागातील आवर्तन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियमित आवर्तन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कालवा सल्लागारची बैठक कधी?
धरणातील पाणीसाठा समाधानकारक असला तरी त्याचे शास्त्रशुद्ध नियोजन अत्यावश्यक असते. कालवा सल्लागार समितीची बैठक ही पाण्याच्या वाटपाचे दिशादर्शन करणारी प्रक्रिया मानली जाते. परंतु पाणी वापर संस्थांकडून अद्याप अपेक्षित मागणी प्राप्त न झाल्याने ही बैठक घेण्यात आलेली नाही, अशी माहिती पाटबंधारे प्रशासनाकडून देण्यात आली.
पाण्याची ‘मागणी’ झालीच तर ‘अर्थ’
शेती सिंचनाच्या प्रश्नासाठी कार्य करणाऱ्या पाणी वापर संस्था उजव्या व डाव्या कालव्याच्या लाभार्थ्यांची पाणी मागणी फॉर्म भरून घेत मुळा पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द करतात. परंतु गेल्या काही वर्षापासून पाणी वापर संस्थाकडून अपेक्षीत पाणी मागणी फॉर्म दिले जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाणी वापर संस्था पाणी मागणी अर्ज देत नसल्यानेच कालवा सल्लागार समितीची बैठक होत नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे.
रब्बीचे दुसरे आवर्तन 25 नंतर ?
रब्बीचे दुसरे आवर्तन 25 फेब्रुवारीच्या सुमारास निश्चित होण्याची शक्यता आहे. उजव्या कालव्यासाठी सुमारे 4,500 दलघफू आणि डाव्या कालव्यासाठी 400 दलघफू पाणी देण्याचे प्राथमिक नियोजन चर्चेत आहे. हे आवर्तन निश्चित झाल्यास उभ्या पिकांना वेळेवर पाणी मिळून उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर उन्हाळी आवर्तन मुळा धरणातून सोडले जाणार आहे.