

संगमनेर: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, नेमक्या कोणत्या मार्गाचा नकाशा रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांच्यासमोर ठेवून चर्चा केली, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. ते नेमक्या कोणत्या रेल्वेमार्गाचा पाठपुरावा करीत आहेत. तो नकाशा संगमनेर तालुक्यातील जनतेला दाखवावा, असे थेट आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले केले आहे. दरम्यान, सरकार बदलल्यानंतर जीएमआरटी का आठवली, रेल्वे मार्गात बदल करण्याचे खरे कारण नेमके काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संगमनेर येथे रविवारी थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रेल्वे संदर्भात अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. पालकमंत्री नाशिक - पुणे रेल्वे प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटल्याचे कळाले. यात आम्हाला आनंदचं वाटतो, मात्र त्यांनी तीनपैकी नेमक्या कोणत्या रेल्वे मार्गाचा नकाशा मंत्री महोदयांना दाखविला, हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे आवाहन थोरात यांनी केले.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला विशेषतः 2020 नंतर गती देण्यात आली. फेब्रुवारी 2020 मध्ये सेंट्रल रेल्वेकडून डीपीआर मंजूर झाला. त्यानुसार नाशिक - सिन्नर - संगमनेर - साकूर - आळेफाटा - नारायणगाव - मंचर - राजगुरुनगर - चाकण - आळंदी - हडपसर - पुणे असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला होता. या संदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली होती. ही संपूर्ण प्रक्रिया माझ्या उपस्थितीसह साक्षीने पूर्ण झाली आहे. सरकारने 350 कोटी रुपये मोघम वाटले का? जेव्हा रेल्वेचे मार्ग तयार होत होते, तेव्हा यासर्व अडचणींचा सारासार विचार झाला होता. त्यातून व्यवस्थित मार्ग काढले होते. मग अचानक सरकार बदलल्यानंतर जीएमआरटी का आठवली. मार्गात बदल करण्याचे खरे कारण नेमके काय, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. या रेल्वेमार्गासंदर्भात आज जी कारणे सांगितली जातात, त्या कारणांचा विचार केल्यानंतरचं सेंट्रल रेल्वेने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यातूनच नाशिक - पुणे रेल्वे सरळ मार्गे धावणार होती. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री रेल्वेमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले जात आहे, परंतू त्यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली, कोणता मार्ग सुचवला, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला.
तडजोड स्वीकारणार नाही!
सध्या आपल्यासमोर तीन रेल्वे मार्ग आहेत. दोन मार्ग संगमनेर व अकोले तालुक्यातून जाणारे आहेत, तर तिसरा मार्ग शिर्डीवरून आहे. पालकमंत्री विखे यांनी, नेमका कोणत्या रेल्वेमार्गाचा नकाशा रेल्वेमंत्र्यांसमोर ठेवून त्यांच्याशी चर्चा केली, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. ते नेमक्या कोणत्या रेल्वेमार्गाचा पाठपुरावा करीत आहेत. तो नकाशा संगमनेर तालुक्यातील जनतेला दाखवावा, जेणेकरून जनतेच्या मनातील संभ्रम दूर होतील. संगमनेर रेल्वे येथील जनतेच्या अस्मितेचा मुद्दा आहे. यावर आज निर्णय झाला नाही तर, पुढील तब्बल पन्नास वर्षे हा प्रकल्प होणार नाही. यामुळे या रेल्वेमार्गाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे थोरात यांनी ठणकावून सांगितले.
रेल्वे भविष्याचा विषय!
रेल्वेच्या विषयावरून राजकारण करण्याची ही वेळ नाही. सर्वांनाच माहिती आहे की, रेल्वे आता झाली तरचं होईल, अन्यथा पुढील तब्बल 100 वर्षेही ती होईल की नाही, याची खात्री नाही. यामुळे राजकारण करण्याची ही वेळ नाही. हा विषयही राजकारणाचा नव्हे तर, या परिसराच्या भविष्याचा आहे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.