Ghargaon Water Crisis Pudhari
अहिल्यानगर

Ghargaon Water Crisis: म्हसवंडीतील आदिवासी महिलांनी ग्रामसभा उधळून लावली

वर्षानुवर्षे घरपोच पाणी न मिळाल्याने महिला दिनी आदिवासी महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला

पुढारी वृत्तसेवा

घारगाव: पाणलोट क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावून विविध बक्षिसे मिळवणाऱ्या पठार भागातील आदर्श गावात पाण्याचा प्रश्न न सुटल्याने आदिवासी महिलांनी, महिला दिनाचीच ग्रामसभाच उधळून लावली. म्हसवंडी (ता. संगमनेर) असे या आदर्श गावाचे नाव...

म्हसवंडीला आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील साधारण एक-दीड हजार आबालवृद्धांच्या डोक्यावर कित्येक वर्षांपासून असलेला हंडा उतरवता आला नाही. याच प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी महिला दिनी (8 मार्च) झालेल्या विशेष ग्रामसभेत आदीवासी महिलांनी केली. मात्र प्रश्न न मिटल्याने महिलांनी ग्रामसभा उधळून लावली.

म्हसवंडी गावांतर्गत वाजेवाडी, ब्राह्मणदरा, मळादेवी मंदिर परिसर डोंगरदऱ्यात असल्याने येथे पाण्याची गंभीर समस्या वर्षानुवर्षे आहे. पावसाळ्यात एक पीक घेतले जाते. इतर वेळी येथील आदिवासी कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी आजूबाजूच्या गावांत मजुरीला जावे लागते. दोन-दोन किलोमीटर पायपीट करून डोक्यावर पाणी वाहावे लागते. ही वणवण कधी थांबणार? डोक्यावरील हंडा कधी उतरणार? असे सवाल त्यांनी ग्रामसभेत केले.

म्हसवंडी ग्रामसभेत बोअरवेल बंदीचा ठराव झालेला आहे. परंतु आदिवासी वाड्या-वस्त्या डोंगर भागात व उंचीवर असल्याने उन्हाळ्यात तेथील पाण्याचे स्रोत आटतात. जलजीवन योजनेची कामे झाली; पण पाणीच पोहचले नाही. त्यामुळे आदिवासी समाजाने स्वखर्चाने बोअरवेल घेण्याची परवानगी ग्रामसभेत मागितली. मात्र ती नाकारली गेली.

ब्राह्मणदरा येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडीलाही पाणी मिळत नाही. विद्यार्थ्यांसह आबालवृद्ध डोंगराडोंगरातून पाणी वाहताना दिसतात. पाणीटंचाईने येथील काही कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. अंध महिलांचेही हीच स्थिती आहे. त्यामुळे महिलांनी ग्रामसभे उधळून लावत तीव्र आंदोलनाचा इशारा रविवारी दिला.

म्हसवंडी पाणलोट क्षेत्र विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. गावात जलसंधारणाची उत्कृष्ट कामे झाली. गावात बोअरवेल बंदीचा ठराव पूर्वीच झालेला आहे. सद्यस्थितीत लोक माझ्या विहिरीवरून पाणी नेत आहेत. आदिवासी समाजाला पाणी घरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बोअरवेलच्या परवानगीबाबत ठोस निर्णय मात्र झाला नाही.
मंगेश बोडके, सरपंच, म्हसवंडी
वर्षानुवर्षे आम्ही डोक्यावर पाणी वाहतो आहोत. पाण्यासाठी संघर्ष करत आहे. आमच्या मुलांना पण पाणी वाहावे लागतेे. त्यांनी शिक्षण कधी घ्यायचे? आमचा पाणी प्रश्न न मिटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.
रोहिणी काळे, रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT