Maharashtra Teachers Census Duty Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Teachers Census Duty: 42 अंश तापमानात शिक्षकांकडून जनगणना; ‘जुलैनंतरच मोहीम घ्या’ची मागणी

उष्माघाताच्या घटनांमुळे शिक्षक संघटना संतप्त; सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

नगर: राज्यात सध्या सुरू असलेल्या जनगणना कामासाठी शिक्षकांना भर उन्हात रस्त्यावर उतरविण्यात आले आहेत. गळ्यात बॅग, डोक्यावर टोपी घालून 42 अंश तापमानात हे प्राथमिक, तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षक घरोघरी जाऊन माहिती संकलित करत आहेत. संगमनेर तालुक्यात जनगणना कामासाठी गेलेल्या एका शिक्षकास उष्माघाताचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करावे लागल्याची घटना घडली.

अशा समोर न आलेल्या अनेक घटना असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ‌‘आणखी किती शिक्षक आजारी पडण्याची वाट पाहत आहात?‌’ असा संतप्त सवाल करत, ही जनगणना जुलैमध्ये करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

जिल्ह्यात जनगणनेसाठी सुमारे 11 हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मे महिन्यात वाढत्या तापमानात शिक्षकांना सकाळपासून दुपारपर्यंत पायपीट करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, सावलीची किंवा वैद्यकीय सुरक्षिततेची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसतानाही शिक्षक काम करत आहेत.

शिक्षणाचे काम सांभाळत राष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शिक्षकांना अशा पद्धतीने उन्हात होरपळायला लावणे अमानवी असल्याची टीका होत आहे. जनगणना हे महत्त्वाचे राष्ट्रीय काम असले तरी शिक्षकांच्या आरोग्याचा बळी देऊन ते राबविणे योग्य नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. उष्णतेची तीव्रता कमी झाल्यानंतर, म्हणजेच जुलै महिन्यानंतर जनगणना राबवावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

कोणतेही राष्ट्रीय काम करण्यास शिक्षक नकार देत नाहीत. मात्र ते करताना अनेक शिक्षक दगावले आहेत. तरीही सुरक्षितता शिक्षकाला मिळत नाही. जनगणना ही उन्हाची तीव्रता संपल्यानंतर जुलैमध्ये करण्यात यावी. शिक्षकांच्या जिवाशी आणखी खेळू नये.
दिनेश खोसे, शिक्षक नेते
जनगणना हे राष्ट्रीय कार्य असल्याने आमचे शिक्षक ते इमाने इतबारे करत आहेत. खरे तर पाच वर्षांपासून रखडलेले हे काम आता 42 डिग्री तापमानात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्याचा अट्टहास प्रशासन आम्हा शिक्षकांना का करतेय, हे न समजणारे आहे. यासाठी सोईची वेळही निवडता आली असती.
डॉ. संदीप मोटे, नेते, गुरुमाऊली मंडळ
जनगणना राष्ट्रीय कर्तव्य आहे. याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र या वर्षीचे विक्रमी तापमान पाहता भर उन्हात हे काम करणे शिक्षकांच्या जीवावर बेतत आहे. सध्याचे तापमान पाहता वेळापत्रकात बदल करणे आवश्यक वाटते.
शरद वांढेकर, नेते, ऐक्य मंडळ
शिक्षकांना भर उन्हात जनगणनेसाठी दारोदार जावे लागत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता, शिक्षकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आवश्यक ती दखल घेतलेली नाही. प्रशासनाने दिलेली बॅग आणि पांढऱ्या टोपीचा दर्जा पाहून चेष्टा केल्यासारखे वाटते. शिक्षकांचा आणखी किती अंत पाहणार?
सुनील गाडगे, राज्य नेते, शिक्षक भारती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT