नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर परिसरात जनावरांच्या गोठ्यांमुळे खारोळी नदीचे पाणी दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे परिसरातील विहिरी हातपंपांंचेही पाणी पिण्यासाठी योग्य राहिले नसल्याचे सांगत ग्रामस्थांकडून संबंधित गोठ्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी (दि.10) आरोग्य विभागाकडून खारोळी नदी व परिसरातील विहिरी, हातपंपांच्या पाण्याची तपासणी करण्यात आली.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी म्हस्के वस्ती, तसेच चापेवाडी शिवारातील खारोळी नदीचे पाणी, तसेच परिसरातील विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती मिळाली. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतर आरोग्य विभागाकडून पाणी पिण्यास योग्य आहे की दूषित याबाबत स्पष्ट केले जाणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून काय अहवाल येतो अन् त्यानंतर काय कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिसरात ठिकठिकाणी पाण्याच्या नमुन्यांची पाहणी केली. तसेच संबंधित गोठ्यावर जाऊनही पाहणी केल्याची माहिती ग्रामस्थांमधून मिळाली. परिसरातील जनावरांच्या गोठ्यांमुळे खारोळी नदी, त्यावरील बंधारे परिसरातील विहिरी, हातपंपांचे पाणी दूषित झाल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खारोळी नदीचे पाणी पिंपळगाव माळवी तलावात जाते. पिंपळगाव माळवी तलावातून जेऊर गाव, तसेच परिसर धनगरवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा गड अशा गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पिंपळगाव तलावातच दूषित पाणी जात असेल, तर परिसरातील सर्वच गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. दूषित पाण्यामुळे नागरिक व लहान बालक मोठ्या प्रमाणात आजारी पडले असल्याचाही गंभीर आरोप म्हस्के वस्ती येथील तरुणांकडून करण्यात आला आहे.
जनावरांच्या गोठ्यांमधील मलमूत्र नदीपात्रात सोडल्याने संपूर्ण नदीतील पाणी दूषित झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पिण्यासाठी पाणी योग्य राहिले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना वणवण भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित गोठ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी म्हस्के वस्ती परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.